काळाने झडप घातलेल्या संदेशला ८५ टक्के गुण
By Admin | Updated: May 29, 2015 01:21 IST2015-05-29T01:21:37+5:302015-05-29T01:21:37+5:30
आमगाव तालुक्यातील विद्यानिकेतन ज्यूनिअर कॉलेज येथील विद्यार्थी संदेश टेंभुर्णे याचा दोन दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला.

काळाने झडप घातलेल्या संदेशला ८५ टक्के गुण
आमगाव : आमगाव तालुक्यातील विद्यानिकेतन ज्यूनिअर कॉलेज येथील विद्यार्थी संदेश टेंभुर्णे याचा दोन दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. परंतु त्याने बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात विज्ञान शाखेत ८५ टक्के गुण मिळविल्याचे स्पष्ट झाले. मृत्यूनंतरही त्याच्या गुणवत्तेची झलक दिसल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
विद्यानिकेतन येथील प्रा. धर्मरक्षित टेंभुर्णे यांचा मुलगा संदेश बारावीच्या विज्ञान शाखेत शिकत होता. स्वत:च्या गुण कौशल्यात तो पारंगत होता. बारावीनंतर उच्चशिक्षणाच्या तयारीत असताना त्याने २६ मे रोजी अॅडव्हान्स एन्ट्रन्स परीक्षा दिली होती. स्वत:चे शिक्षण आयआयटीसारख्या इन्स्टिट्यूट मधून व्हावे, यासाठी तो सतत अभ्यासावर मेहनत घेत असे. या अभ्यासक्रमात संधी मिळेल, या आशेने त्याने पात्रता परीक्षा देऊन कुुटुंबासह तो नागपूरवरून गावाकडे परतीला निघाला होता.
परंतु त्यांच्या वाहनाने लाखनी तालुक्यातील मुंडीपार येथे उभ्या वाहनाला धडक झाली. यातच त्याचा व आईचा मृत्यू झाला. त्याने मृत्यूनंतरही स्वत:च्या गुणकौशल्याचा परिचय आपल्या अभ्यासातून इतरांना संदेश देत गेला. त्याने विद्यालयात गुणवंत ठरत विज्ञान शाखेत ८५ टक्के गुण मिळविले. त्याच्या शिक्षणातील बाजीगरीने मात्र इतरांना संदेश देत तो सर्वांच्या आठवणीत राहणार आहे.
(शहर प्रतिनिधी)