खरिपासाठी शेतकऱ्यांना ८५ टक्के कर्जाचे वाटप
By Admin | Updated: June 13, 2014 00:15 IST2014-06-13T00:15:39+5:302014-06-13T00:15:39+5:30
खरीपाचा हंगाम लक्षात घेत जिल्हा मध्यवर्ती बँकेने या हंगामात कृषी कर्ज वाटपात आघाडी घेतली आहे. अवघ्या काही दिवसात बँकेने ८४.८० टक्के कृषी कर्जाचे वाटप केले आहे. बँकेला ठरवून देण्यात आलेल्या

खरिपासाठी शेतकऱ्यांना ८५ टक्के कर्जाचे वाटप
गोंदिया : खरीपाचा हंगाम लक्षात घेत जिल्हा मध्यवर्ती बँकेने या हंगामात कृषी कर्ज वाटपात आघाडी घेतली आहे. अवघ्या काही दिवसात बँकेने ८४.८० टक्के कृषी कर्जाचे वाटप केले आहे. बँकेला ठरवून देण्यात आलेल्या ७५ कोटी ८६ रूपयांच्या उद्दीष्टापैकी ६ जूनपर्यंत ६४ कोटी ३३ लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये ५४ हजार ६६ एकर शेत जमिनीसाठी ३२० संस्थांच्या १९ हजार ६८५ सभासदांना कर्जवाटप झाले.
रबी हंगाम संपून पिक बाजारात आले आहे. आता खरिपाचा हंगाम सुरू झाला असल्याने शेतकऱ्यांची खरिपासाठी धावपळ सुरू झाली आहे. त्यातही जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी वरथेंबी पाण्यावर अवलंबून असल्याने त्यांचा पूर्ण खेळच खरिपावर अवलंबून असतो. यामुळे शेतकरी कंबर कसून परिवारासह शेतात उतरला आहे. विशेष म्हणजे बहुतांश शेतकरी सहकारी संस्था, सावकार व जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेऊनच आपली शेती पिकवितात. यामुळेच खरिपाचा हंगाम बघून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही खरीप हंगामासाठी कृषी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट वाढवून त्यानुसार कर्ज वाटपाला सुरूवात केली.
जिल्हा बँकेने यंदा उत्कृष्ट कामगिरी केली असल्याचे दिसून येत आहे. बँकेने ठरवून दिलेल्या उद्दीष्टाच्या ८४.८० टक्के कर्जवाटप मोठे, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना केले आहे. जिल्ह्यात ६ जूनपर्यंत करण्यात आलेल्या कर्ज वाटपाची तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास, गोंदिया तालुक्यात एक हजार ९०३ सभासदांना सहा कोटी २९ लाख ९७ हजार रूपये, तिरोडा तालुक्यात तीन हजार ३०७ सभासदांना ११ कोटी ९८ लाख ९३ हजार रूपये, गोरेगाव तालुक्यात एक हजार ९२८ सभासदांना सहा कोटी १९ लाख ९२ हजार रूपये, आमगाव तालुक्यात दोन हजार ६७४ सभासदांना सात कोटी ७६ लाख २५ हजार रूपये, सालेकसा तालुक्यात ६५६ सभासदांना दोन कोटी २५ लाख ८२ हजार रूपये, अर्जुनी मोरगाव तालुक्यात पाच हजार २२६ सभासदांना एक हजार १६ कोटी सहा लाख ९१ हजार रूपये, देवरी तालुक्यात एक हजार १८१ सभासदांना चार कोटी २९ लाख ३४ हजार रूपये तर सडक अर्जुनी तालुक्यात दोन हजार ८१० सभासदांना नऊ कोटी ४६ लाख १७ हजार रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण ३२० संस्थांना ५४ हजार ६६ एकर शेतीसाठी या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. यातही जिल्हा बँकेकडून वाटप करण्यात आलेल्या या कृषी कर्जाचा लाभ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतल्याचे निर्दशनास येते. येथील पाच हजार २२६ सभासदांना १६ कोटी सहा लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सालेकसा तालुक्यात सर्वात कमी ६५६ सभासदांना दोन कोटी २५ लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आल्याचे दिसते. (शहर प्रतिनिधी)