वादळाने बाधित ८३ गावे वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2016 01:57 IST2016-05-29T01:57:24+5:302016-05-29T01:57:24+5:30

परिसरात आलेल्या चक्रीवादळाने अनेकांना बेघर केले. बरेच कुटुंब आजही समाज मंदिरात आणि इतरत्र आसरा घेऊन आहेत.

83 villages affected by the storm | वादळाने बाधित ८३ गावे वाऱ्यावर

वादळाने बाधित ८३ गावे वाऱ्यावर

समाजमंदिरात आश्रय : मदतीचा दिलासा देण्याची मागणी
कालीमाटी : परिसरात आलेल्या चक्रीवादळाने अनेकांना बेघर केले. बरेच कुटुंब आजही समाज मंदिरात आणि इतरत्र आसरा घेऊन आहेत. अनेक गावात विद्युत खांब आणि डीपी कोसळल्याने संपूर्ण गावे अंधारात असून त्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सर्वत्र होत आहे.
कालीमाटी परिसरात व आमगाव तालुक्यात एकूण ४३ गावांना चक्रीवादळाचा फटका बसला. येथील गावात नागरिकांचे घर कोसळले तर काहीचे छप्पर उडून गेले. सुपलीपार येथे भिंत पडून मृतक राखडे (६०) यांचा मृत्यू झाला. बऱ्याच ठिकाणी घरातील जनावरे दगावल्याची घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसर चक्रीवादळाच्या दहशतीत अजुनही दिसत आहे. बहुतेक कुटुंबाचे अन्न, वस्त्र ढिगाऱ्याखाली आल्याने एक वेळचे जेवन निश्चित नाही. सध्या दररोज दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान निसर्ग आपला रंग बदलवीताना दिसतो. ५ ते १० मिनट सोसाट्याचा वारा वाहतो. त्यामुळे पुन्हा चक्रीवादळ तर नसेल ना? अशी भीती नागरिकांत दिसून येते.
या चक्रीवादळाच्या तळाख्यात मृत्युमुखी पडलेल्या राखडे कुटुंबाला चार लाख रुपये, जनावरांसाठी एकूण रक्कम २७ हजार रुपये, ६७ घरांना २८ लाख ३६ हजार ९०० रुपये व इतर असे ३३ लाख ४६ हजार २०१ रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई करीता तहसीलदार साहेबराव राठोड यांनी जिल्हा आपत्ती निवारण समिती जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती सादर केली.

निवाऱ्यासाठी भटकंती
चक्रीवादळाच्या कचाट्यात सापडलेल्या कालीमाटी येथील रुपचंद गिऱ्हेपुंजे, कृष्णा भांडारकर, हिरामण महारवाडे, लीलाधर गिऱ्हेपुंजे, लिखन टेंभरे, धनलाल रहांगडाले यांच्या घरावरील छत्र उडून गेले तर घनश्याम शेंडे, सोनू कापसे, यादोराव कावळे, माणिकचंद रहांगडाले, धनलाल रहांगडाले, केवल रहांगडाले आणि इतर नागरिकांच्या घराचे व कडधान्याचे नुकसान झाले आहे.
गावे अंधारमय
घाटटेमनी, कालीमाटी, कट्टीपार, भोषा, मानेकसा व इतर गावांत विद्युत विभागाने युद्धपातळीवर कामे सुरू केली आहे. गावातील विद्युत खांब कोसळल्याने विद्युत विभागाची बरीच हाणी झाली आहे. परिसरातील गावांमध्ये ६०-७० विद्युत खांब कोसळल्यामुळे तसेच विद्युत वाहिणी खंडीत पडल्याने बऱ्याच गावात पाच दिवस लोटूनही विद्युत पुरवठा सुरू झाला नाही. विद्युत उपकेंद्र कालीमाटी (कट्टीपार) येथील विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी येथे अधिकारी, १२ कर्मचारी आणि इतर सहकारी रोजंदारी कर्मचारी युद्धपातळीवर रात्रंदिवस काम करीत असल्याचे दिसून येतात. या चक्रीवादळामुळे नागरिकांना अंधारमय जीवन जगण्यास भाग पाडले आहे.

Web Title: 83 villages affected by the storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.