७ हजार ७७९ घरकुलांना मंजुरी
By Admin | Updated: May 24, 2015 01:37 IST2015-05-24T01:37:16+5:302015-05-24T01:37:16+5:30
सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविण्यात येतात. ..

७ हजार ७७९ घरकुलांना मंजुरी
गोंदिया : सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविण्यात येतात. सुरक्षित निवारा असणे ही मानवाची मुलभूत व महत्वपूर्ण गरज आहे. वर्ष २०१४-१५ या वर्षाकरिता इंदिरा आवास योजनेंतर्गत ७ हजार ७७९ कुटुंबांना घरकुलासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
ऊन, वारा, थंडी व पावसापासून संरक्षण देणारे हक्काचे घर असावे. हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते व कुटुंबीयांना सुरक्षित जीवन देण्याचे ध्येय असते. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा दारिद्र्यरेषेखालील बेघर कुटुंबांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देणारी इंदिरा आवास योजना शासनाद्वारे राबविण्यात येते. जिल्ह्यात ग्रामीण भागात एकूण २ लाख ५१ हजार ४८३ कुटुंबे आहेत. यापैकी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाची संख्या १ लाख ४४ हजार २४३ एवढी आहे. या कुटुंबांना निवाऱ्याकरिता ग्रामपंचायत निहाय बेघर कुटुंबाची कायम प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील ५८ हजार १२० कुटुंबाना इंदिरा आवास योजना, राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध योजना व मागास भागांसाठी अनुदान निधी योजनेमार्फत १०० टक्के अनुदानावर लाभ देण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखाली कुटुंबाच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटल्यामुळे त्याचे राहणीमान उंचावले आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे दारिद्र्यनिर्मुलन करण्यासाठी, गावातील वंचित घटकांना एकत्र आणून त्यांच्या संस्था उभारण्यासाठी या संस्थेमार्फत गरजुंना वित्तीय संस्था पुरविणे, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा फायदा नागरिकांना विकासाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)