६० सारसांवर थायमेटचे संकट
By Admin | Updated: September 21, 2015 01:36 IST2015-09-21T01:36:12+5:302015-09-21T01:36:12+5:30
निसर्गाचा लाजाळू पक्षी व शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून गणल्या जाणाऱ्या सारसाचे निवासस्थान धान असलेल्याा शेतात आहे.

६० सारसांवर थायमेटचे संकट
लोकमत विशेष
नरेश रहिले गोंदिया
निसर्गाचा लाजाळू पक्षी व शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून गणल्या जाणाऱ्या सारसाचे निवासस्थान धान असलेल्याा शेतात आहे. परंतु धानाचे पिक जोमदार यावे यासाठी शेतकरीवर्ग धानावर थायमेट नावाचे किटकनाशक मारत असल्याने हे थायमेट सारसांचे कर्दनकाळ ठरत आहे. एकीकडे सारस संवर्धनासाठी तरूण झटताहेत तर दुसरीकडे सारसांचे वास्तव्य असलेल्या शेतात थायमेटचा वापर वाढल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
महाराष्ट्रात फक्त गोंदिया जिल्ह्यात सारस पहायला मिळते. दहा वर्षापूर्वी अत्यल्प असलेली सारसांची संख्या आता ६० च्या घरात पोहचली आहे. या सारसाचे अंडी गोंदिया जिल्ह्यातील दासगाव, काटी, बिरसोला, लाडसा, फुटाळा, पांजरा,घाटटेमणी, तिरोडा, गोरेगाव तालुक्याच्या पालेवाडा व मध्यप्रदेशातील अनेक ठिकाणातून चोरीला गेले आहेत. तिरोडा येथील रेल्वे स्थानकाजवळ सन २००६ रोजी आढळलेल्या सारसच्या दोन अंडी संदर्भात बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या. यामुळे ती अंडी व सारस पाहण्यासाठी अनेक लोक कुतूहलाने त्या ठिकाणी गेले होते. त्यांनी त्या अंड्याना स्पर्श केल्याने ते अंडी खराब झाली व या ठिकाणाहून असलेले सारस जोडपेही निघून गेली. ज्या बांधीत सारस अंडी घालते त्या बांधीतील छोट्या भागातील धानाची नासाडी होते. मात्र या धानातील सर्व किटक व परिसरातील धानातील किटक दररोज एक जोडी तीन किलोच्या प्रमाणे आहार करीत असल्याने या धान पिकाला किटकनाशक लागत नाही. या बांधीतून त्या बांधीत दरवळणाऱ्या सारसाच्या पायाने धान पिकातील ओल्या मातीचे खुंदल होत असल्याने हे पीक जोमाने भरभराटीस येते. सारस असलेल्या शेतातील धान उत्पादन ४० टक्क्याने अधिक येत असल्याची माहिती निसर्ग मित्र व मानद वन्यजीव संरक्षक सावन बहेकार यांनी दिली आहे. धानाचे उत्पादन ४० टक्क्याने वाढते. सारस ज्या शेतात वास्तव्यास असतो त्या शेतातील दीड किलो किटक एक सारस दिवसभऱ्यात खात असतो. सोबतच त्या शेतातील धान पिकांचे कुचलन (खुंदल) करीत असल्याने हे धान भरभराटीस येत असते. या पक्ष्याचा कर्कश आवाज दूरवर ऐकायला येते. एकदा ज्या ठिकाणी घरटी करता त्याच ठिकाणी दुसऱ्या वर्षीही घरटी करतात.
गोंदिया, भंडारा व मध्यप्रदेशच्या बालाघाट या तीन जिल्ह्यात सारस संवर्धनाचे काम सुरू आहे.गोंदिया जिल्ह्यात सारसांची संख्या सर्वाधिक आहे. भंडारा येथे सहा तर बालाघाट असे मिळून ६० च्या घरात सारसांची संख्या येथील परिसरात आहे.
तीन जिल्ह्याच्या सारसांच्या संवर्धनासाठी मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, मुनेश गौतम, अभिजीत परिहार, शशांक लाडेकर, अंकीत ठाकूर दुष्यंत आकरे, चेतन जसानी, बबलु चुटे, प्रवीण मेंढे, विवेक खरकाटे, भंडारा येथील शाहद खान, मंगेश मस्के व बालाघाट येथील अभय कोचर हे सारस संवर्धनासाठी काम करीत आहेत.
पावसाचा अंदाज घरट्यांवर
पावसाळ्यात अंडी घालणारे हे सारस पक्षी उंचावर अंडी घालण्यासाठी घरटे तयार केल्यास त्यावर्षी पाणी अधिक येईल व ज्या वर्षी अंडी खालच्या भागावर तयार केले तेव्हा पाणी कमी येते हा अंदाज आमगाव तालुक्याच्या शिवणी येथील ज्येष्ठ नागरिक धानुजी भुते यांनी सांगितला आहे. सारस अंडी घालण्यासाठी तयार केलेल्या घरट्याप्रमाणे पाण्याचा वर्षाव झाल्याचे ऐंशीच्या वयात असलेल्या धानुजी भुते यांनी सांगितले आहे.
अंडीवर वन्यप्राण्यांचा ताव
घरट्यात अंडी घालणाऱ्या सारसाच्या अंडीवर जंगलातील कोल्हे, डोमकावळे, साधे कावळे ताव मारीत असतात. सोबतच पक्षी पळविणाऱ्या शिकाऱ्यांचीही नजर त्या अंडीवर असते. कधी-कधी शेतकरीही त्या अंडीना घेऊन जातात किंवा फेकून देतात. शेतीचे नुकसान होऊ नये असा गैरसमज त्यांचा असतो. मात्र हे सारस शेतकऱ्यांच्या धानाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते. पिल्लं उडतांना विद्युत तारांच्या मध्ये आल्याने दगावतात.
प्रेमासाठी त्यागाचे प्रतिक
भारतात सारस पक्ष्याचे जोडपे पाहून नवीन लग्न झालेले जोडपे आपल्या सुखी जीवनाची सुरूवात करतात. जिल्ह्यात या सारसाच्या जोडीला राम-लक्ष्मण म्हणून संबोधले जाते. जून महिन्यात सारसची जोडी एकत्र येते. जोडीने नृत्य करणे, उड्या घेणे व गवताच्या काड्या ऐकमेकावर फेकणे, पुरूष जातीचे सारस चोच वर करून पंख पसरविते तर मादा जातीचे सारस मान खाली करून प्रतिसाद देते. सारस प्रेमात त्याग ही करते. सारस पक्ष्याचे एकमेकावरील प्रेम त्यागाचे प्रतिक आहे. जोडीतील एक सारस मेल्यावर दुसराही सारस त्यागच्या भावनेतून आपले प्राण त्यागतो.