राष्ट्रीय कुटुंब योजनेत ३ वर्षांत ५५ लाभार्थी
By Admin | Updated: November 9, 2014 22:32 IST2014-11-09T22:32:10+5:302014-11-09T22:32:10+5:30
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत १८ ते ५९ वयोमर्यादा असणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येते. १८ आॅक्टोबर २०१२ पासून सदर योजना सुरु असून या योजनेतील निकष बदलविण्यात आले.

राष्ट्रीय कुटुंब योजनेत ३ वर्षांत ५५ लाभार्थी
दिलीप चव्हाण - गोरेगाव
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत १८ ते ५९ वयोमर्यादा असणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येते. १८ आॅक्टोबर २०१२ पासून सदर योजना सुरु असून या योजनेतील निकष बदलविण्यात आले. या योजनेत लाभार्थ्यांना २० हजार लाभ दिला जातो. या योजनेचा आजपर्यंत ५५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.
जनतेमध्ये शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचा प्रसार व्हावा, त्यांना योजनांचा लाभ तत्काळ मिळावा या उद्देशाने शासन विविध माध्यमातून योजनांची जाहिरात करते. मात्र स्थानिक प्रशासनाच्या जनजागृती अभावी सदर योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नाही.
विशेष सहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना या योजना चालविल्या जातात. या सर्व योजना स्थानिक पातळीवर महसूली यंत्रणेमार्फत राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी स्थानिक पटवारी व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावे लागते. निकषात बसणाऱ्या अर्जदारास योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी शासनाने नेमलेल्या समितीच्या माध्यमातून लाभार्थी निकषात बसतो किंवा नाही, त्यानुसार निर्णय घेतले जाते. मात्र शासनाच्या या योजना जनजागृती अभावी रखडल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.
शासनाच्या वरील सर्व योजनाचा लाभ बँक, पोस्ट आॅफीसच्या माध्यमातून दिला जातो. या सर्व योजनेतून मिळणारा लाभ केंद्रशासन व राज्य शासनाकडून दिला जातो. शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत ६५ वर्षावरील २१ हजाराच्या आत उत्पन्न असणाऱ्या नागरिकाला लाभ घेता येतो. या योजनेत ६०० रुपये प्रतिमाह निवृत्ती वेतन देता येते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील वृद्धांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (गट ब) मधून ४०० रुपये व केंद्र शासनाकडून २०० रुपये असे एकूण ६०० रुपये प्रतिमहिना लाभार्थ्यांना दिले जाते. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेत ६० ते ६५ वर्षावरील दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती पात्र ठरतात. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेत ४० ते ४५ वर्षापेक्षा कमी वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील विधवा योजनेत पात्र ठरतात. या योजनेच्या माध्यमातून ६०० रुपये दरमहा दिले जाते. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेत ८० टक्के पेक्षा जास्त दारिद्र्य रेषेखालील १८ ते ६५ वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र शासन व राज्य सरकारकडून ६०० रुपये निवृत्तीवेतन देण्यात येतो.