४४ हजार क्विंटल बियाणे लागणार
By Admin | Updated: May 29, 2015 01:20 IST2015-05-29T01:20:50+5:302015-05-29T01:20:50+5:30
खरीप हंगामाची शेतकरी वर्ग जोमाने कामाला लागला आहे. त्यासाठी मशागतीची कामे सध्या सुरू आहेत.

४४ हजार क्विंटल बियाणे लागणार
गोंदिया : खरीप हंगामाची शेतकरी वर्ग जोमाने कामाला लागला आहे. त्यासाठी मशागतीची कामे सध्या सुरू आहेत. मात्र सोबतच बियाणे आणि खतांची सोय करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशा विविध कंपन्यांनी शेतकऱ्यांवर जाळे टाकणे सुरू केले आहे. आपलेच बियाणे कसे चांगले आहे हे दाखवत विविध कंपन्या शेतकऱ्यांना खुणावत आहेत. मात्र कंपन्यांच्या प्रलोभनांना बळी न पडता जागरूकपणे कसा निर्णय घ्यावा, याचे मार्गदर्शन कृषी विभागाने देणे सुरू केले आहे.
यावर्षी जिल्ह्यात १.९५ लाख हेक्टरमध्ये विविध पिकांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. प्रामुख्याने भात हे मुख्य पिक असून ४४ हजार क्विंटल भात बियाणे लागण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने तालुकानिहाय विक्री केंद्रावर ते उपलब्ध करवून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाबीजकडून तालुकानिहाय बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे.
खरीप हंगामासाठी शासनाकडून ५८ हजार १०० मेट्रीक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले असून तालुकानिहाय कृषी केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके योग्य दर्जाचे उपलब्ध व्हावे म्हणून जास्तीत जास्त नमूने काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश सबंधितांना देण्यात आले आहे. जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा उत्पादक आणि विक्रेत्यांची बैठक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांच्या अध्यक्षतेत आयोजित करून सर्व संबंधितांना कृषी निविष्ठा साठवणूक आणि विक्रीबाबत योग्य मार्गदर्शन करून निर्देश देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना कृषी निविष्ठाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी पंचायत समितीकडे संपर्क साधून तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदी करते वेळी अधिकृत कंपन्यांचे व अधिकृत कृषी केंद्रातूनच बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी करावे. खरेदी केलेल्या कृषी निविष्ठाची पक्की पावती प्राप्त करून घ्यावी अशा सूचना कृषी विभागाने केल्या आहेत. बियाण्यांच्या नियोजनात गोंदिया तालुक्यात ४ हजार ५०० क्विंटल, तिरोडा तालुक्यात ४ हजार क्विंटल, आमगाव तालुक्यात ४ हजार क्विंटल, गोरेगांव तालुक्यात ३ हजार ५०० क्विंटल, सडक-अर्जुनी तालुक्यात ४ हजार ५०० क्विंटल, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ४ हजार ५०० क्विंटल, सालेकसा तालुक्यात २ हजार क्विंटल, देवरी तालुक्यात ३ हजार क्विंटल असे एकूण ३० हजार क्विंटल भात बियाणे पुरवठ्याचे नियोजन महाबीजमार्फत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे खाजगी कंपन्यांकडून १४ हजार क्विंटल पुरवठाचे नियोजन असून एकूण ४४,००० क्विंटल भात बियाणे उपलब्ध होणार आहे. आवश्यकतेनुसार पुरवठा होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)