चार महिन्यांत मलेरियाचे २३३ रूग्ण
By Admin | Updated: May 24, 2015 01:36 IST2015-05-24T01:36:05+5:302015-05-24T01:36:05+5:30
जिल्ह्यात डासांचा प्रकोप काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातही अविकसीत भागांत मलेरियाने आजही दहशत पसरवून ठेवली आहे.

चार महिन्यांत मलेरियाचे २३३ रूग्ण
दरेकसा व घोनाडी संवेदनशील : मागील वर्षीच्या तुलनेत रुग्ण वाढले
गोंदिया : जिल्ह्यात डासांचा प्रकोप काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातही अविकसीत भागांत मलेरियाने आजही दहशत पसरवून ठेवली आहे. त्यामुळेच यंदा चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात २३३ मलेरिया रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात सालेकसा तालुक्यातील दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्र व देवरी तालुक्यातील घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांतील आकडेवारी चिंतेचे कारण बनली आहे.
मागील चार महिन्यांतील आकडेवारी बघितल्यास, मलेरिया रूग्णांची संख्या २३३ वर पोहचली आहे. सन २०१४ च्या आकडेवारीशी तुलना केल्यास यंदा मलेरिया रूग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. कारण सन २०१४ च्या सुरूवातीच्या चार महिन्यांत १६१ रूग्णांची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा ७२ रूग्ण जास्त आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या सुरूवातीच्या चार महिन्यांत नोंद करण्यात आलेल्या २३३ रूग्णांत १०५ रूग्ण दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मिळाले आहेत. तर घोनाडी आरोग्य केंद्रातील २८ रूग्ण आढळून आले आहेत.
मलेरियाच्या दृष्टीने जिल्ह्यात दरेकसा व घोनाडी हे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र संवेदनशील मानले जातात. कारण मागील वर्षांपासून जिल्ह्यात मलेरियाचे जास्त रूग्ण या दोन आरोग्य केंद्रांतूनच आढळून येत असल्याचे जिल्हा मलेरिया विभागाच्या आकेडवारीवरून दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)
१.१८ लाख संशयितांची रक्त तपासणी
मागील वर्षी जानेवारी महिन्यात ४१, फेब्रुवारी महिन्यात २८, मार्च महिन्यात ६२ व एप्रिल महिन्यात ३० मलेरियाचे रूग्ण आढळून आले होते. यंदा जिल्ह्यात जानेवारी महिन्यात १०९, फेब्रुवारी महिन्यात ४३, मार्च महिन्यात ३२ व एप्रिल महिन्यात ४७ मलेरियाचे रूग्ण मिळून आले आहेत. यावरून जिल्ह्यात मलेरियाचा प्रकोप काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच यंदा जानेवारी महिन्यात २७ हजार ५९८, फेब्रुवारी महिन्यात ३० हजार ५०८, मार्च महिन्यात ३१ हजार ५२५ तर एप्रिल महिन्यात २८ हजार १९५ अशाप्रकारे एकूण एक लाख १७ हजार ८२६ जणांची रक्त तपासणी करण्यात आली आहे.
१ जूनपासून फवारणी मोहीम
पावसाळ््यात डासांचा प्रकोप वाढत असल्याने त्यादृष्टीने येत्या १ जूनपासून मलेरिया विभागाकडून जिल्ह्यात डासनाशक फवारणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेंतर्गत जिल्ह्यातील २४० गावांत डासनाशक फवारणी होणार असल्याचे जिल्हा मलेरिया विभागाचे निरीक्षक डॉ.सलील पाटील यांनी सांगितले.