दोन वर्षांत २०४ शेतकऱ्यांनी घेतला लाभ

By Admin | Updated: February 4, 2016 01:53 IST2016-02-04T01:50:55+5:302016-02-04T01:53:01+5:30

शेतकऱ्यांनी धानपिकाशिवाय फळ व फूलशेतीकडे वळावे यासाठी शासन कृषी विभागामार्फत अनेक योजना राबवितो.

204 farmers took benefit in two years | दोन वर्षांत २०४ शेतकऱ्यांनी घेतला लाभ

दोन वर्षांत २०४ शेतकऱ्यांनी घेतला लाभ

ठिंबक व तुषार सिंचन : विदर्भ सधन सिंचन कार्यक्रम
देवानंद शहारे गोंदिया
शेतकऱ्यांनी धानपिकाशिवाय फळ व फूलशेतीकडे वळावे यासाठी शासन कृषी विभागामार्फत अनेक योजना राबवितो. अनेक योजनांत अनुदानही दिल्या जाते. मात्र गोंदिया जिल्ह्यात धानपीक वगळता इतर शेती करण्यास शेतकरी उत्सुक नसल्याचे प्रस्ताव व मंजूर प्रकरणांनुसार दिसून येते. मागील दोन वर्षांत ठिंबक व तुषार सिंचन योजनेचा केवळ २०४ शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याचे कृषी विभागाने दिलेल्या संख्येवरून दिसून येते.
ठिंबक सिंचन म्हणून रोपांच्या मुळांवर विशिष्ट पद्धतीने थेंबथेंब पाणी देणे. तर तुषार सिंचन (स्प्रिंग कलर) म्हणजे रोपांच्या वरून विशिष्ट पद्धतीने फव्वारा पद्धतीने पाणी देणे, अशी सुटसुटीत व्याख्या केली जाऊ शकते. विदर्भ सधन सिंचन कार्यक्रमांतर्गत यात सन २०१३-१४ मध्ये केवळ ५२ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. त्यासाठी त्यांना ६५.१४ लाख रूपयांचे अनुदानही देण्यात आले. तर सन २०१४-१५ मध्ये १५२ शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला. त्यांना अनुदानापोटी २०.१३ लाख रूपये देण्यात आले. तर सन २०१५-१६ मधील २५१ लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रस्तावित असल्याचे जिल्हा कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सदर २५१ प्रस्तावित प्रस्तावांमध्ये आमगाव तालुक्यातील १०, अर्जुनी-मोरगार तालुक्यातील २५, देवरी तालुक्यातील ९, गोंदिया तालुक्यातील ५१, गोरेगाव तालुक्यातील २७, सडक-अर्जुनी तालुक्यातील ९८, सालेकसा तालुक्यातील ८ व तिरोडा तालुक्यातील २२ प्रस्तावांचा समावेश आहे. हे सर्व प्रस्ताव ७ डिसेंबर २०१५ ते ७ जानेवारी २०१६ दरम्यान आॅनलाईन लिंकिंग करण्यात आले आहेत. मात्र यापैकी किती शेतकरी सदर योजना राबविण्यासाठी पुढे येतात, हे वेळेच सांगेल.

लाभार्थ्याची पात्रता
मागील दोन वर्षांपासून सदर योजना सुरू आहे. लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावे मालकी हक्काचा सातबारा व ८ अ असावा. शेतात विहीर किंवा बोअरवेल असावी. जे पीक घ्यायचे आहे त्याची नोंद सातबारावर असावी. किंवा मंडळ कृषी अधिकाऱ्याने मौका तपासणी अंती पीक असल्याचे प्रमाणपत्र द्यावे. विद्युत पंपाची जोडणी असावी. सिंचन क्षेत्र ०.२० हेक्टरपेक्षा कमी नसावे. योजनेत अनुसूचित जातीसाठी १६ टक्के, अनुसूचीत जमातीसाठी ८ टक्के, अल्प, अत्यल्प व महिला शेतकऱ्यांसाठी ३३ टक्के रक्कम उपयोगात आणावी तसेच लाभार्थ्याने यापूर्वी विदर्भ सधन सिंचन कार्यक्रमांतर्गत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अत्यल्प म्हणजे ज्याची शेती एक हेक्टरपर्यंत व अल्प म्हणजे एक ते दोन हेक्टरपर्यंत शेती, असा अर्थ आहे.

Web Title: 204 farmers took benefit in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.