मुदत संपूनही १.७८ लाख नागरिकांनी घेतला नाही दुसरा डोस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:01 IST2021-09-02T05:01:46+5:302021-09-02T05:01:46+5:30
कपिल केकत गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशातच कहर केला व कित्येकांना त्यांच्या कुटुंबीयांपासून हिरावून नेले. कोरोनाचा कहर ...

मुदत संपूनही १.७८ लाख नागरिकांनी घेतला नाही दुसरा डोस !
कपिल केकत
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशातच कहर केला व कित्येकांना त्यांच्या कुटुंबीयांपासून हिरावून नेले. कोरोनाचा कहर पुढे होऊ नये यासाठी शास्त्रज्ञांनी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करावे असा सल्ला दिला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहीम जोमात राबविली जात आहे. याचे फलित असे की, १६ जानेवारी रोजी सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ७५१७८७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणात जिल्हा अग्रेसर असून, ही वाखाणण्याजोगी बाब आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील तब्बल १७८००० नागरिकांनी मुदत संपूनही आतापर्यंत दुसरा डोस घेतलेला नाही. कोरोनापासून सुरक्षेसाठी दोन्ही डोस घेणे गरजेचे असताना मात्र हे नागरिक आपल्याच मस्तीत वागत असताना दिसत आहेत.
------------------------
१) लस दुसऱ्या डोससाठीची मुदत
कोविशिल्ड ८४ दिवस
कोव्हॅक्सिन २८ दिवस
२) जिल्ह्यात झालेले लसीकरण (ग्राफ)
पहिला डोस - ५८१२२६
दुसरा डोस - १७०५६१
--------------------
दुसरा डोसही तितकाच आवश्यक
- कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसी अत्यंत प्रभावी असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. शरीरात कोरोनाविरोधात प्रतिपिंड तयार करण्यासाठी या लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असल्याचे शास्त्रज्ञांकडून सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे.
- त्यानुसार, दोन्ही लसींमध्ये ठरावीक कालावधी ठरवून दुसरा डोस दिला जात आहे; कारण यातून त्या लसींची कार्यक्षमता अधिक वाढते व प्रतिपिंड तयार होऊन अधिक कालावधीपर्यंत आपल्या सुरक्षित ठेवते.
------------------------------
शेतीची कामे, कोरोना गेल्याचा संभ्रम
जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असून आजघडीला जिल्ह्यात फक्त दोन बाधित आहेत. यामुळे आत कोरोना गेल्याने लस घेण्याची गरज काय, असा संभ्रम नागरिकांत आहे. शिवाय, सध्या शेतीची कामे सुरू असून डोस घेतल्यास ताप येणार व अशात कामे खोळंबणार हा विचार करूनही नागरिक दुसरा डोस टाळत असल्याचे दिसून येत आहे.
------------------------------
दोन्ही डोस गरजेचे
कोरोनापासून सुरक्षेसाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. आता जिल्ह्यातून कोरोना गेला असा संभ्रम न बाळगता प्रत्येकाने आपले डोस पूर्ण करणे गरजेचे आहे. यामुळे लवकरात लवकर डोस घेऊन स्वत:सह आपल्या कुटुंबालाही सुरक्षित करा.
- डॉ. भूमेश पटले, जिल्हा समन्वयक