१७०० बालमजूर मुख्य प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:36 IST2018-12-16T23:35:26+5:302018-12-16T23:36:57+5:30
शहरातील कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणे, नदीतील रेतीतून सोने शोधणाऱ्या, रेल्वेत भीक मागणाऱ्या, मांग-गारूडी, पेंढारी व शाळाबाह्य बालमजुरांना त्यांचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी सरकारने बालसंक्रमण शाळा सुरू केल्या.

१७०० बालमजूर मुख्य प्रवाहात
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणे, नदीतील रेतीतून सोने शोधणाऱ्या, रेल्वेत भीक मागणाऱ्या, मांग-गारूडी, पेंढारी व शाळाबाह्य बालमजुरांना त्यांचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी सरकारने बालसंक्रमण शाळा सुरू केल्या. सन २००६ ते २०१८ या कालावधीत जिल्ह्यात १७०० बाल कामगारांना मुख्यप्रवाहात आणले आहे. त्यांना शिक्षणांसाठी नियमित जि.प. शाळेत दाखल करण्यात आले. यात १० वी १२ वी होणारी शेकडो मुले आहेत.
बाल कामगारांना पकडणे व त्यांना शाळेत टाकून मोकळे होण्याचे काम अनेक जिल्ह्यात होत असते. परंतु गोंदिया जिल्ह्याने बाल कामगारांसंदर्भात नेहमी चांगली भावना ठेवून त्यांना यशस्वी नागरिक घडविण्याचा प्रयत्न गोंदिया जिल्हा प्रशासनाने केला आहे. जिल्ह्यात पाच ते १० हजाराच्या घरात बालमजूर असले तरी शासनाकडे त्यांची नोंद आतापर्यंत एकूण १७०० करण्यात आली आहे.
या बालमजुरांसाठी गोंदिया शहराच्या यादव चौकात, मुर्री, गोंडीटोला, गौतमनगर, कुडवा, सुंदरनगर, गड्डाटोली, छोटा गोंदिया, अदासी, तिरोडा, काचेवानी, एकोडी (नवरगाव), मुंडीकोटा,भीमनगर (घोगरा), सालेकसाच्या बाबाटोली व मुरकुटडोह दंडारी येथे शाळा उघडण्यात आल्या आहेत. त्या बाल मजुरांना त्यांचा मूलभूत हक्क मिळावा. यासाठी शासन तत्परता दाखवून बाल कामगारांच्या उत्थानासाठी कार्य करीत आहेत.
यात १० वी व १२ होणारे शेकडो बालकामगार जिल्ह्यात आहेत. शिक्षण घेताना मृत पावलेल्या दोन बाल कामगारांच्या पालकांना प्रत्येकी १५ हजार रूपये असे ३० हजार रूपये मदत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. आजघडीला ४५४ बालमजूर शिक्षण घेत आहेत.
त्यांची पावले वळू लागली उच्च शिक्षणाकडे
बालकामगारांनी १० वी १२ वी शिक्षण घेतले तर ते पुरे आहे. परंतु गोंदियात पकडलेल्या बालमजुरांनी उच्च शिक्षणाचा ध्यास घेतल्याने आता त्यांना मुख्य प्रवाहात येण्यास अडचण नाही. कामगार कार्यालयाने पकडलेल्या बाल कामगारांना पायभूत शिक्षण दिले आहे. शेकडो बालके १० वी व १२ वी झाले. भीमनगर (मुंडीकोटा) येथील प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेतलेला मुनेश शेंडे या विद्यार्थ्यांने डीएड पूर्ण केले आहे. सदर प्रकल्पांतर्गत शिक्षक निर्देशक या पदावर सद्या कार्यरत आहे. कुडवा येथील संजय कांबळे हा विद्यार्थी सध्या भंडारा येथे इलेक्ट्रीक इंजिनियर म्हणून पदवी घेतली आहे. आणखी दोन मुले इंजिनियरींग करीत आहेत.
संगोपन करते शासन
बालसंक्रमण शाळेत शिकणाºया बालकांना दर महिन्याला ४०० रूपये निर्वाहभत्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. त्यांची नोंदणी शाळेत झाल्यावर त्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके देऊन त्यांच्यासाठी मध्यान्ह भोजनाची सोय देखील करण्यात आली आहे. या संगोपनामुळे त्यांना मुख्य प्रवाहात येण्यास मोलाची मदत होत आहे.