६६६ विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या १७ शाळा

By Admin | Updated: September 14, 2015 01:43 IST2015-09-14T01:43:29+5:302015-09-14T01:43:29+5:30

नगर पालिकेच्या शाळांना जडलेला विद्यार्थी पटसंख्या गळतीचा रोग अद्यापही नियंत्रणात आलेला नाही.

17 schools of the school for 666 students | ६६६ विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या १७ शाळा

६६६ विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या १७ शाळा

कपिल केकत गोंदिया
नगर पालिकेच्या शाळांना जडलेला विद्यार्थी पटसंख्या गळतीचा रोग अद्यापही नियंत्रणात आलेला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पालिकेच्या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या ११२ ने घटली आहे. पटसंख्येची ही घट सुरूच असल्याने पालिकेतील काही शाळांत बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी दिसत आहेत. हे चक्र असेच सुरू राहिले तर काही वर्षातच नगर परिषदेवर आपल्या सर्व शाळा बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नवीन शैक्षणिक सत्रात पालिकेच्या प्राथमिक शाळांत (वर्ग १ ते ७) फक्त ६६६ विद्यार्थ्यांची नोंद आहे. असे असतानाही या नाममात्र विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या १७ शाळा सुरू आहेत. एका खाजगी शाळेत हजारावर विद्यार्थी असताना पालिकेच्या १७ शाळांत ६६६ विद्यार्थी असणे ही आश्चर्याची व तेवढीच चिंतनाची बाब आहे. घटत चाललेल्या पटसंख्येमुळे मात्र पालिकेच्या या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
आजघडीला शहरातील खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ झाल्या आहेत. यात निकाल म्हणा की पटसंख्या दोन्ही बाबतीत पालिकेच्या शाळा माघारलेल्या आहेत. खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याची वेळ येत असताना मात्र पालिकेच्या शाळात आता शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी घरोघरी जाण्याची पाळी आली आहे. एकतर पालिकेच्या शाळांचा घसरत चाललेला दर्जा, त्यात निकालांत पालिकेची एकही शाळा १०० टक्के निकाल देत नसल्याने पालकांचाही कल आता खाजगी शाळांकडे वाढत चालल्याचे दिसून येत आहे.
हेच कारण आहे की, कधी विद्यार्थ्यांनी खचाखच भरणाऱ्या पालिकेच्या शाळा आता ओस पडत आहेत. मागील कित्येक वर्षांपासून पालिकेच्या शाळांना पटसंख्या गळतीचा हा रोग जडला आहे. मात्र यावर तोडगा काढण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.
मागील वर्षी सन २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात पालिकेच्या १८ प्राथमिक शाळांमध्ये ८९७ विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत होते. सन २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात गळतीची ही साथ सुरूच होती व पटसंख्या ७७८ वर आली होती. तर सन २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात ही संख्या ६६६ वर आली आहे. म्हणजेच या वर्षी पालिके ने ११२ विद्यार्थी गमावले आहेत.
या विद्यार्थ्यांनी एखाद्या खाजगी शाळेची वाट धरली असेल यात शंका नाही. दिवसेंदिवस घटत चाललेली ही विद्यार्थी संख्या पालिकेसाठी गंभीर विषय आहे. मात्र पालिका प्रशासन याबाबतीत अद्यापही गंभीर नसल्याने गळतीचा हा प्रकार थांबण्याचे काही नाव घेत नसल्याचे दिसते.
या शैक्षणिक सत्रातही पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची आकडेवारी बघावयाची झाल्यास फक्त २, ४, १२, १७ एवढे विद्यार्थी आहेत. बोटावर मोजण्याएवढी विद्यार्थी संख्या असतानाही शिक्षणाचा दर्जा मात्र खालावलेलाच असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच पालक आपल्या पाल्यांचे भविष्य धोक्यात न घालता त्यांना रक्कम मोजून खाजगी शाळांमध्ये टाकत असल्याचे दिसून येत आहे.
कुठे दोन तर कुठे अवघे चार विद्यार्थी !
पालिकेच्या हिंदी टाऊन शाळेत फक्त दोन तर सिव्हील लाईन्स मराठी शाळेत चार विद्यार्थी आहेत. हिंदी टाऊन शाळेत दोन विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक तर सिव्हील लाईन्स मराठी शाळेत चार विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक व एक चपरासी कार्यरत आहेत. या सहा विद्यार्थ्यांसाठी पालिकेला दोन शाळा चालवाव्या लागत असून शिक्षक व चपराश्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. अशात या शाळा बंद करून हिंदी टाऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे मालवीय शाळेत व सिव्हील लाईन्स मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे इंजिनशेड शाळेत समायोजन करण्याचा प्रस्ताव येत्या आमसभेत मांडणार असल्याचे पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे लिपीक रतन पराते यांनी सांगितले.

Web Title: 17 schools of the school for 666 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.