सेंद्रिय शेतीतून वर्षाकाठी १३ लाखांचा नफा
By Admin | Updated: December 6, 2014 01:48 IST2014-12-06T01:48:17+5:302014-12-06T01:48:17+5:30
धानाच्या शेतीमुळे अंगावर कर्जाचा डोंगर उभा झाला. मात्र त्याच शेतीत सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मिश्रपीक घेऊन तोट्यात असलेल्या शेतीला ...

सेंद्रिय शेतीतून वर्षाकाठी १३ लाखांचा नफा
गोंदिया : धानाच्या शेतीमुळे अंगावर कर्जाचा डोंगर उभा झाला. मात्र त्याच शेतीत सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मिश्रपीक घेऊन तोट्यात असलेल्या शेतीला नफ्यात आणण्याची किमया झिलमिली येथील धनीराम रतिराम भाजीपाले या शेतकऱ्याने केली आहे. या वर्षात त्याने तब्बल १३ लाखांची कमाई शेतपिकातून केली.
गोंदिया तालुक्याच्या झिलमिली येथील धनीराम भाजीपाले हे आपल्या १३ एकर शेतीत धानाचे पीक घ्यायचे. मात्र धानाला भाव नसल्याने व फवारणी औषधी महागडी असल्याने ते दरवर्षी तोट्याची शेती करीत असत. परंतु शेतीतूनच आपला आर्थिक विकास साधायचा ही त्यांची मनोमन इच्छा होती. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाकडे त्यांचा कल होता. यातच त्यांना कृषी विभागाकडून सेंद्रिय शेतीची माहिती मिळाली. त्यांनी सेंद्रिय शेतीच्या आधारावर आपल्या १३ एकरांच्या शेतात मिश्र प्रकारची शेती यशस्वी केली. त्यात सहा एकरांत केळीची बाग लावली. या केळीच्या बागेतून पहिल्या वर्षी तीन लाख, दुसऱ्या वर्षी अडीच लाख, तिसऱ्या वर्षी दोन लाख तर चौथ्या वर्षी दीड लाख रुपये मिळकत झाली. त्यांनी ७५ डिसमील शेतीत हळद लावली. त्यातून २० क्विंटल हळदीचे उत्पन्न मिळविले. काही जागेत बटाटे लावून १० क्विंटल बटाट्याचे उत्पन्न घेतले व हे बटाटे पेप्सी, कोला कंपनीला दिले.
दुधी भोपळ्यापासून एक लाख रुपये उत्पन्न घेतले. अर्धा एकरात चवळीच्या शेंगा लावून ७५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. कोवळ्याचे २० क्ंिवटल उत्पादन घेतले. भेंडीचे २५ क्विंटल उत्पादन घेतले. याचबरोबर कोथिंबीर व टरबुजाचेही उत्पादन घेतले. परंतु यावर्षी टरबुजात अपयश आल्याचे भाजीपाले यांनी सांगितले.
याचबरोबर दोन एकरात लंगडा, चवसा, केशर, नागीन, आम्रपाली, सफेदा व गावराणी अशी आंब्याची झाडे लावली. या आंब्यापासून ते एक एकरामागे दोन लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. आता त्यांनी भेंडीच्या जागी पपई लावून विक्रमी उत्पादन घेण्याचा मानस बांधला आहे. भाजीपाले यांनी वर्षभरात २० लाख रुपयांचे उत्पादन घेतले.
त्यातील सात लाख रुपये उत्पादनावर खर्च झाले असून १३ लाखांचा निव्वळ नफा शेतीतून मिळवून आपला आर्थिक विकास साधला आहे. (तालुका प्रतिनिधी)