१०७ राईस मिल्सने केले परवान्याचे नूतनीकरण
By Admin | Updated: February 3, 2016 01:51 IST2016-02-03T01:51:00+5:302016-02-03T01:51:00+5:30
जिल्हा धानाचे कोठार म्हणून ख्यातिप्राप्त असला तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे धानाचे उत्पादन व त्यामुळे धानाचा व्यापारही मंदावला आहे.

१०७ राईस मिल्सने केले परवान्याचे नूतनीकरण
एफडीए थंड : मिल्सची संख्या घटली?
गोंदिया : जिल्हा धानाचे कोठार म्हणून ख्यातिप्राप्त असला तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे धानाचे उत्पादन व त्यामुळे धानाचा व्यापारही मंदावला आहे. परिणामी जिल्ह्यातील राईस मिल्स मोठ्या संख्येत बंद पडून आहेत. परिणामी ३३५ राईस मिल्समधील फक्त १०७ राईस मिलर्सकडूनच परवान्याचे नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती आहे.
धान (तांदूळ) हे खाद्य पदार्थांत येत असल्याने राईस मिल व्यवसायाला अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना घेणे कायद्याने बंधनकारक केले आहे. धानाची मिलींग केल्यानंतर तयार झालेल्या तांदळाची विक्री केली जाते. एकंदर हा खाद्य पदार्थाचा व्यवसाय झाल्याने राईल मिल्स हा परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार राईस मिलर्स अन्न व प्रशासनाकडून परवाना घेतात. किमान एक वर्ष ते कमाल पाच वर्षांसाठी हा परवाना घ्यावा लागतो. यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून शुक्ल ठरविले आहे.
जानेवारी ते डिसेंबर या कालावधीसाठीचा हा परवाना राहत असून यंदा जिल्ह्यातील १०७ राईस मिलर्सनेच हा परवाना घेतल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून मिळाली आहे. जिल्ह्यात एकूण ३३५ राईस मिल्स असून आजघडीला त्यातील मोठ्या संख्येत राईस मिल्स बंद पडून आहेत. तांदळाला मागणीच नसल्याने राईस मिल व्यवसायावर गाज आल्याची माहिती राईस मिलर्सकडून मिळते. मात्र धानाच्या कोठारातच राईस मिल्सची ही गत झाल्याने हा प्रकार मात्र आश्चर्यकारकच आहे. (शहर प्रतिनिधी)
एफडीला माहितीच नाही
राईस मिल्सला परवाना देण्याचे आधिकार अन्न व औषध विभागाकडे देण्यात आले आहे. असे असतानाही एफडीएकडे जिल्ह्यातील राईस मिल्सबाबत तंतोतंत माहिती नसल्याचा प्रकार जाणवला. विशेष म्हणजे एफडीएचे कार्यालय गोंदियात सुरू करण्यात आले आहे. मात्र येथे भंडारा कार्यालयातील एक लिपीक येऊन बसतात. त्यांच्याकडेही माहिती नसते तर भंडारा येथेही याबाबत माहिती नसल्याचा प्रकार दिसून आला