१० टक्के लोक हृदयरोगाच्या कक्षेत

By Admin | Updated: September 24, 2016 01:40 IST2016-09-24T01:40:12+5:302016-09-24T01:40:12+5:30

सध्या वाढलेला तणाव, कमी होत असलेले शारीरिक श्रम, आहारातील अनियमितता, वाढलेले वजन, व्यसनाधिनता, मधुमेह, उच्च रक्तदाब यामुळे हृदयरोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

10 percent of people in heart disease | १० टक्के लोक हृदयरोगाच्या कक्षेत

१० टक्के लोक हृदयरोगाच्या कक्षेत

डॉ.बाहेकर यांची माहिती : पाच मधुमेहींपैकी एकाला ग्रासतो हृदयरोग
नरेश रहिले  गोंदिया
सध्या वाढलेला तणाव, कमी होत असलेले शारीरिक श्रम, आहारातील अनियमितता, वाढलेले वजन, व्यसनाधिनता, मधुमेह, उच्च रक्तदाब यामुळे हृदयरोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भारतात सध्या ७ कोटी लोकांना हृदयरोग आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे आता समाजातील १० टक्के लोक हृदयरोगाच्या कक्षेत आले आहेत. त्यामुळे वेळीच योग्य ती काळजी घेऊन हृदयरोगाला दूर ठेवण्याचा सल्ला हृदयरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
३० वर्ष वयोगटापेक्षा अधिक वयाच्या लोकांना हृदयरोग होत आहे. मधुमेहाचे रूग्ण असलेल्या पाच व्यक्तींपैकी एकाला हृदयरोग तर सर्वसामान्यांत १० टक्के लोकांना हृदयरोग असल्याची माहिती गोंदियातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दीपक बाहेकर यांनी दिली.
मृत्यू पावण्याच्या कारणांमध्ये अपघातामुळे सर्वाधिक लोक दगावतात. त्यानंतर हृदयविकाराचा दुसरा क्रमांक लागतो. हृदयविकार नियंत्रणात आणता येतो. अनुवांशिकतेमुळेही हृदयरोग होतो. महिलांपेक्षा पुरूषांमध्ये हृदयरोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. महिलांपेक्षा पाच पटीने जास्त पुरूषांना हृदयरोग होतो. ग्रामीण भागातील १५ टक्के लोकांना तर शहरी भागातील २० टक्के लोकांना हृदयरोग असल्याचे वैद्यकीय पाहणीत आढळून आले आहे. वाढलेल्या व्यसनांमुळेही कमी वयातच या आजाराला बळी पडावे लागत आहे. व्यक्तीचे बीएमआय २३ पेक्षा कमी असावे अन्यथा त्या व्यक्तीला हृदयरोग होऊ शकतो. हृदयरोग असणाऱ्या व्यक्तीने तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार जीवनमानात योग्य तो बदल केल्यास ७० टक्के हृदयरोग कमी होतो असे डॉ.बाहेकर म्हणाले.

ध्यान-योगा ठरतो फायदेशिर
सुरुवातीपासूनच ध्यान-धारणा व योगा-प्राणायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोग होत नाही. ध्यान मनावर नियंत्रण ठेवते तर योगा शरीरावर नियंत्रण ठेवते. यात जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण घेवून ध्यान-योगाचा आपल्या जीवनात समावेश केल्यास हृदयरोग होणे टाळले जावू शकते. रूग्णाने ध्यान-योगा पद्धतीचा अंतर्भाव आपल्या जीवनपद्धतीत केला तर हृदयरोगावर नियंत्रण मिळविले जावू शकते.

जिल्हा सामान्य रुग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ नाहीत
१४ लाख लोकसंख्येसाठी असलेल्या गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ नाही. त्यामुळे या रूग्णालयात हृदयरोग तज्ज्ञांची सेवा घेण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. वैद्यकीय महाविद्यालयासाठी हृदयरोगतज्ज्ञ आलेत परंतु ते सेवाच देत नसल्याची ओरड आहे.

Web Title: 10 percent of people in heart disease