पर्रीकरांचा सरकारवर वरचष्मा
By Admin | Updated: December 9, 2014 00:55 IST2014-12-09T00:52:05+5:302014-12-09T00:55:52+5:30
पणजी : मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री बनले व लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री बनले तरी, सरकारवर अजूनही पर्रीकर यांचाच वरचष्मा आहे.

पर्रीकरांचा सरकारवर वरचष्मा
पणजी : मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री बनले व लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री बनले तरी, सरकारवर अजूनही पर्रीकर यांचाच वरचष्मा आहे. अजूनही राज्य मंत्रिमंडळ पर्रीकर यांच्याच प्रभावाखाली असून दर शनिवार-रविवारी गोव्यात मुक्काम करून पर्रीकरच सरकारच्या कारभाराचा गाडा अप्रत्यक्ष पुढे नेत आहेत.
काही अधिकाऱ्यांशी खासगीत बोलल्यानंतर सरकारमधील सद्यस्थिती कळून आली. पर्रीकर मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारमधील किमान चार मंत्री तरी आपल्या फाईलवर पेन्सिलीने नोटिंग लिहीत. पर्रीकर अशा फाईल्स आपल्या टेबलवर ठेवून घ्यायचे. रात्रीच्यावेळी ते ह्या फाईल्स वाचायचे. एखादी फाईल मंजूर करण्यामध्ये व मंत्र्याच्या नोटिंगमध्ये कायदेशीर काही अडचण आहे का हे ते अॅडव्हकेट जनरलांकडून समजून घेत. पर्रीकरांनी हिरवा कंदील दाखवला किंवा नोटिंगमध्ये सुधारणा केली की मग मंत्र्यांकडून पेनाने नोटिंग लिहिले जात. अर्थात या पद्धतीमागे पर्रीकर यांचा हेतू वाईट नसायचा. मंत्री कोणत्याच अडचणीत येऊ नये, म्हणून पर्रीकरांकडून हे केले जात होते. मात्र, अजूनही राज्य मंत्रिमंडळ पर्रीकरांच्या प्रभावातून बाहेर आलेले नाही, हे स्पष्ट आहे.
संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी गोवा सरकारच्या कामकाजातून व कारभारातून आपले अंग अजूनही काढून घेतलेले नाही. दर शनिवार-रविवारी पर्रीकर येथे आल्यानंतर मुख्यमंत्री पार्सेकर त्यांच्याशी चर्चा करतात. काही मंत्र्यांशीही पर्रीकर चर्चा करतात व कोणते विषय कितपत मार्गी लागले आहेत हे समजून घेतात. मुख्यमंत्री म्हणून पार्सेकर अजूनही पूर्ण स्वतंत्र झालेले नाहीत. काही मंत्रीही शनिवार-रविवार येईपर्यंत व पर्रीकर गोव्यात पोहचेपर्यंत आवडत्या प्रकल्पांचे प्रस्ताव घेऊन थांबतात. (पान ७ वर)