सुरक्षा रक्षक भरतीत स्थलांतरितांना संधी!
By Admin | Updated: July 2, 2015 01:35 IST2015-07-02T01:35:39+5:302015-07-02T01:35:50+5:30
पणजी : मानव संसाधन विकास महामंडळाने सुरक्षा रक्षक भरतीसाठी प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता २६0 उमेदवारांपैकी केवळ १00 सुरक्षा रक्षकांनाच शारीरिक चाचणीसाठी

सुरक्षा रक्षक भरतीत स्थलांतरितांना संधी!
पणजी : मानव संसाधन विकास महामंडळाने सुरक्षा रक्षक भरतीसाठी प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता २६0 उमेदवारांपैकी केवळ १00 सुरक्षा रक्षकांनाच शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहण्याविषयी पत्र पाठविले आहे. आंदोलनकर्त्या सुरक्षा रक्षकांना वगळून महामंडळ बिगर गोमंतकीयांनाच जास्त पदे देऊ पाहत असल्याचा आरोप कामगार नेत्या स्वाती केरकर यांनी बुधवारी केला.
कांपाल येथे सकाळी सुरक्षा रक्षकांनी एकत्रित येऊन महामंडळाच्या या प्रकाराचा निषेध केला. या वेळी कामगार नेत्या स्वाती केरकर यांनी सांगितले की, आंदोलनकर्त्या सुरक्षा रक्षकांना नोकरी भरती प्रक्रियेत फसविण्यात येत आहे. ४२ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सुरक्षा रक्षकांना डावलले आहे. सरकारने आंदोलन केलेल्या सर्व सुरक्षा रक्षकांना एप्रिलपर्यंत नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या नोकर भरती प्रक्रियेत विविध कारणे देऊन सुरक्षा रक्षकांना वगळण्यात येत आहे. पाचशे सुरक्षा रक्षकांच्या निुयक्तीसाठी जाहिरात काढली होती. त्यात कंत्राटी मजूर भरती संस्थेचे २६0 सुरक्षा रक्षकांनी अर्ज केले होते. यातील केवळ १00 सुरक्षा रक्षकांना शारीरिक चाचणी परीक्षेसाठी बोलाविले आहे.
याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, पाचशे सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीसाठी एक हजार तीन अर्ज सादर झाले होते. त्यातील नियमात बसणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी बोलाविल्याचे अधिकारी कुलासो यांनी सांगितले. सरकार आश्वासनांवरच ठाम राहिले नसून सुरक्षा रक्षकांच्या नोकरीशी खेळ मांडण्यात येत आहे. सहा महिने चारशेहून अधिक सुरक्षा रक्षक बेरोजगार असून सरकारच्या आश्वासनामुळे व विरोधी पक्षातील आमदारांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन मागे घेतले होते. आता प्रत्यक्षात सुरक्षा रक्षकांच्या नोकरीबाबत फसवणूक करण्यात येत असून बिगर गोमंतकीय कामगारांना या नोकरीवर रुजू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा आरोप केरकर यांनी केला. (प्रतिनिधी)