भाजपाकडून ‘संगीत खुर्ची’वर पडदा
By Admin | Updated: March 3, 2016 03:03 IST2016-03-03T03:02:56+5:302016-03-03T03:03:58+5:30
पेडणे : राज्याला १० वर्षांत ११ मुख्यमंत्री देऊन विरोधकांनी सत्तेच्या संगीत खुर्चीचा खेळ चालविला होता.

भाजपाकडून ‘संगीत खुर्ची’वर पडदा
पेडणे : राज्याला १० वर्षांत ११ मुख्यमंत्री देऊन विरोधकांनी सत्तेच्या संगीत खुर्चीचा खेळ चालविला होता. हा खेळ भाजपाने बंद पाडून विरोधकांना अद्दल घडवतानाच राज्याचा चौफेर विकास केला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी येथे केले.
पेडणे टॅक्सी स्टॅँड येथे बुधवारी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. भाजप सरकारने चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभा आयोजिली होती. सभेस लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, स्थिर व स्वच्छ प्रशासन आणि चाळीसही मतदारसंघांचा चौफेर विकास हा भाजपाच करू शकतो.
सभेला उपसभापती विष्णू वाघ, पंचायतमंत्री राजेद्र आर्लेकर, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, थिवीचे आमदार किरण कांदोळकर, भाजपा सरचिटणीस सदानंद तानावडे, जिल्हा सदस्य अरुण बांधकर, रमेश सावळ, पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष कृष्णा गावडे, मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष रमेश शेटमांद्रेकर, दीपक कळंगुटकर, मांद्रे सरपंच वैशाली शिरोडकर, विर्नोडा सरपंच सीताराम परब नगराध्यक्ष स्मिता कुडतरकर, उपनगराध्यक्ष उपेंद्र देशप्रभू, नगरसेवक गजानन सावळ देसाई, दीपक मांद्रेकर, प्रशांत गडेकर, सिद्धेश पेडणेकर, नगरसेविका श्रद्धा माशेलकर, स्वाती कांबळी, तुये सरपंच प्राजक्ता कान्नाईक, नीलेश नाईक, शैलजा मळीक, धारगळ सरपंच सुनिता राऊळ, कासारवर्णे सरपंच मोहिनी नाईक, उगवे सरपंच विनायक महाले, नागेश गोसावी आदी हजर होते.
पेडणे तालुक्याचा विचार केल्यास रस्ते, पूल, हॉस्पिटल, कॉलेज बस स्टॅँड पोलीस स्टेशन, शाळा या साधनसुविधांची कामे जोरात चालू आहेत. त्यामुळेच विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये. पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी बोलताना जनतेचा पैसा जनतेकडे पोचवण्याची किमया केवळ भाजपा सरकारच करू शकतो. यापूर्वी तो पैसा कुठे जात होता? अशी विचारणा केली. मात्र, या विषयावर बोलताना माड हे जंगल झाड नव्हे तो लावावा लागतो. माड हे जंगल झाड नसताना ते फॉरेस्ट अॅक्टमध्ये का घातले असा सवाल करून ज्या जमिनी नागरिकांनी बेकायदा विकत घेतल्या त्या जमिनींचीही चौकशी होईल, असे आर्लेकर म्हणाले. उपसभापती विष्णू वाघ यांनी पुढील २५ वर्षांसाठी भाजपाशिवाय राज्याला पर्याय नाही. भाजपा हा लोकांचा पक्ष आहे. असे सांगून गोव्याचे नंदनवन भाजपाच करू शकतो असे सांगितले. ज्याला वडाची झाडे सांभाळता येत नाहीत ते माड कसे सांभाळतील, असा सावाल केला.
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी कॉँग्रेसचे नेते दिशाभूल करीत आहेत. यापूर्वीच्या सरकारने योजना का राबवल्या नाहीत, असा सवाल केला. थिवीचे आमदार किरण कांदोळकर यांनी जनतेला दिलेली आश्वासने ९९ टक्के भाजपाने पूर्ण केली असून भविष्यातही राज्यात भाजपा सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा सदस्य रमेश सावळ यांनी आतापर्यंत भाजपाने राबविलेल्या योजनांची माहिती दिली.
जिल्हा सदस्य अरुण बांधकर यांनी सूत्रसंचालन केले.
(प्रतिनिधी)