सर्वपित्री अमावस्या: पुराण काळापासून सुरू असलेला महत्त्वाचा आचारधर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2024 10:41 IST2024-09-30T10:40:14+5:302024-09-30T10:41:51+5:30

पितृपक्षातील अमावस्येला हे 'सर्वपित्री अमावस्या' हे नाव आहे.

sarva pitru amavasya 2024 most important rituals in pitru paksha | सर्वपित्री अमावस्या: पुराण काळापासून सुरू असलेला महत्त्वाचा आचारधर्म

सर्वपित्री अमावस्या: पुराण काळापासून सुरू असलेला महत्त्वाचा आचारधर्म

प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुराणकाळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व आपल्या ऋषीमुनींनी अनेक धर्मग्रंथांतून लिहून ठेवले आहे.

पितृपक्षातील अमावस्येला हे 'सर्वपित्री अमावस्या' हे नाव आहे. या तिथीवर कुळातील सर्व पितरांसाठी उद्देशून हे श्राद्ध केले जाते. वर्षभरात किंवा पितृपक्षातील अन्य तिथींवर श्राद्ध करणे संभव न झाल्यास, या तिथीवर सर्वांसाठी हे श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण पितृपक्षातील ही अंतिम तिथी आहे. शास्त्रात सांगितले आहे की, श्राद्धासाठी अमावस्येची तिथी अधिक योग्य तिथी आहे आणि पितृपक्षातील अमावास्या ही सर्वाधिक योग्य तिथी आहे.

शास्त्रात ज्या कृतींसाठी जो काळ नेमून दिलेला आहे, त्या त्या काळात त्या कृती करणे आवश्यक आणि महत्त्वाचे ठरते. त्यामुळे पितृपक्षातच महालय श्राद्ध करावे. पितृपक्षात महालय श्राद्ध करण्याविषयी निरनिराळे पक्ष सांगितले आहेत. सांप्रत मृत व्यक्तीच्या (मृत्यू झालेल्या) तिथीलाच पितृपक्षात एक दिवस महालय श्राद्ध केले जाते. जननाशौच किंवा मरणाशौच (सुवेर-सुतक) किंवा अन्य काही अपरिहार्य कारणामुळे एखाद्याला त्या तिथीला महालय श्राद्ध करणे शक्य न झाल्यास सर्वपित्री अमावास्येला करावे. अन्यथा सोयीनुसार कृष्ण पक्षातील अष्टमी, द्वादशी, अमावास्या आणि व्यतीपात योग या दिवशीही महालय श्राद्ध करता येते.

पितृपक्षात जर सूतक पडले तर, मृत व्यक्तीची तिथी जर सूतक संपल्यावर येत असेल तर तेव्हा पितृपक्षातील विधी करू शकतो, जर मृत व्यक्तीची तिथी सूतक असलेल्या दिवसांत असल्यात सर्वपित्री अमावास्याला विधी करू शकतो. यात फक्त मृत व्यक्ती जर आपले आई-वडील यांपैकी कोणी असल्यास त्यांचे श्राद्ध याच वर्षी करू शकत नाही. पुढील वर्षी करु शकतो.

कलियुगात कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकालाच आध्यात्मिक त्रास असल्याने, श्राद्ध करण्याच्या जोडीला 'श्री गुरुदेव दत्त' हा नामजपही अधिकाधिक करावा. दत्त ही देवता पितरांचा स्वामी असल्याने त्याचे नामजपाने पितरांना सद्गती मिळण्यास मदत होते त्याचा लाभ आपल्यालाही होतो. 

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ 'श्राद्ध'. संकलक : तुळशीदास गांजेकर, सनातन संस्था, साखळी.
 

Web Title: sarva pitru amavasya 2024 most important rituals in pitru paksha