विद्यार्थिदशेतच नेतृत्व गुण ओळखा!: मुख्यमंत्री; युवकांना राजकारणात येण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2025 11:03 IST2025-01-14T11:02:50+5:302025-01-14T11:03:50+5:30
स्वामी विवेकानंद यांच्या १६२ व्या जयंतीनिमित्त गोवा विद्यापीठात विद्यार्थी संघटना, उच्च शिक्षण संचालनालय, माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्यावतीने सोमवारी दोनापावला येथील दरबार हॉलमध्ये आयोजित केलेल्या 'यंग लीडर्स कॉन्क्लेव्ह' मध्ये मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते.

विद्यार्थिदशेतच नेतृत्व गुण ओळखा!: मुख्यमंत्री; युवकांना राजकारणात येण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आजच्या युवकांना राजकारणासह सर्वच क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी आहे. या संधीचा फायदा त्यांनी घ्यावा. जर विकसित भारत घडवायचा असेल तर युवकांनी राजकारणात येण्याची गरज आहे. आज भाजपमध्ये ५० टक्क्यांहून अधिक नेत्यांनी विद्यार्थिदशेत चळवळी केल्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
स्वामी विवेकानंद यांच्या १६२ व्या जयंतीनिमित्त गोवा विद्यापीठात विद्यार्थी संघटना, उच्च शिक्षण संचालनालय, माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्यावतीने सोमवारी दोनापावला येथील दरबार हॉलमध्ये आयोजित केलेल्या 'यंग लीडर्स कॉन्क्लेव्ह' मध्ये मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. वीरेंद्र सोलंकी, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर, गोवा विद्यापीठ विद्यार्थी परिषदचे अध्यक्ष विनय राऊत व इतर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पूर्वी विद्यार्थ्यांना राजकारणात जास्त संधी मिळत नव्हती. पण १९९४ नंतर अनेक युवक ज्यांनी त्या काळात नेतृत्व केले त्यांना राजकारणात संधी मिळाली. सध्या भाजपच्या ५० टक्के नेत्यांनी विद्यार्थी नेता म्हणून राजकीय प्रवास सुरू केला आहे. आपण समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणारे नेते असणे महत्त्वाचे आहे. अशी संधी काही लोकांनाच मिळत असते. त्या संधीचे आपण सोने केले पाहिजे.
गोवा विद्यापीठात २ लाख चौ. मी. जागेत फार्मसी, संगीत कला महाविद्यालयासाठी स्वतंत्र कॉम्प्लेक्स उभारण्याचा विचार आहे. तसेच पुढील सहा महिन्यांत फार्मसी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली जाणार आहे. राज्यात नर्सिंगचे बहुतेक विद्यार्थी बीएससी करून नोकरी करतात. यामुळे एमएस्सी नर्सिंगधारकांची संख्या कमी झाली आहे. यासाठी आता मुख्यमंत्री अॅप्रेंटीसशिप योजनेअंतर्गत एमएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याबाबतचा विचार करणार आहे. राज्यात मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबत सध्या नियोजन स्तरावर काम सुरू आहे. भविष्यात गोव्यातही मेट्रो रेल्वे येणार आहे. याबाबत प्रस्तावही तयार केला जात आहे. राजधानी पणजी आणि म्हापसा येथील बसस्थानक जुने झाले असून ते नवीन बांधण्याचा विचार आहे. यासाठी चर्चा सुरू केली आहे.
'एनजीओ'मुळे मुख्यमंत्री
माझे मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न हे माझ्या सामाजिक कामातून घडले. १९९६ साली महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर मी पाळी येथे माझे आयुर्वेदिक क्लिनिक सुरू केले. त्याच दरम्यान साई लाईफ केअर ही एनजीओ सुरू केली. या एनजीओमार्फत समाजकार्य करत गेलो. २००८ साली पर्रीकरांनी राजकारणात येण्याची संधी दिली. त्यावेळी मी हरलो पण माघार घेतली नाही. त्यानंतर आमदार, सभापती व मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. युवकांनी फक्त नोकरीमागे न लागता एनजीओ सुरु करा, सरकार सर्व मदत करायला तयार असल्याचेही ते म्हणाले.
स्वामी विवेकानंदांचे विचार आजही युवकांना प्रेरणा देणारे आहेत. त्या काळत युवकांना देशाची समाजाची चिंता होती. तर आताच्या युवकांना स्वतःची काळजी असते. विवेकानंदांनी कधीच स्वतःचा विचार केला नाही. देशहिताचे काम केले म्हणून त्यांचे विचार हे जगभर पोहचले आहेत. - डॉ. विरेंद्र सोलंकी, राष्ट्रीय सरचिटणीस, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद