चर्चिल, रवी, नार्वेकरांचा काळ संपला
By Admin | Updated: May 19, 2014 01:31 IST2014-05-19T01:25:55+5:302014-05-19T01:31:15+5:30
पणजी : चर्चिल आलेमाव, रवी नाईक, दयानंद नार्वेकर अशा एकेकाळच्या हेविवेट राजकारण्यांचा काळ आता संपला आहे, ही गोष्ट यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट केली.

चर्चिल, रवी, नार्वेकरांचा काळ संपला
पणजी : चर्चिल आलेमाव, रवी नाईक, दयानंद नार्वेकर अशा एकेकाळच्या हेविवेट राजकारण्यांचा काळ आता संपला आहे, ही गोष्ट यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट केली. या तिन्ही नेत्यांना अतिशय कमी मते मिळाली असून, पराभवाने सातत्याने त्यांची पाठ धरली आहे. त्यावरून राजकारणातील या तीन नेत्यांचे दिवस आता राहिलेले नाहीत हे निकालाने दाखवून दिले. चर्चिल आलेमाव यांचा विधानसभा निवडणुकीत नावेली मतदारसंघात पराभव झाल्यानंतर नावेली मतदारसंघानेही त्यांना पूर्णपणे बाजूला केले. नावेली, बाणावली व काही प्रमाणात सावर्डे मतदारसंघातच चर्चिल यांचा प्रभाव आहे, असे मानले जात होते. ते ख्रिस्ती धर्मीय मतदारांची बर्यापैकी मते मिळवतील, असेही वाटत होते; पण प्रचंड पैसा खर्च करूनदेखील आलेमाव यांना मतदारांची साथ लाभली नाही. यावेळच्या लोकसभा निवडणुकीने आलेमाव यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आल्याचे स्पष्ट केले आहे. आलेमाव यांच्यापेक्षा आम आदमी पक्षाच्या स्वाती केरकर या नवख्या उमेदवार दक्षिणेतील लोकांना सरस वाटल्या. चर्चिल व रवी नाईक हे एकेकाळी मास लिडर मानले जात होते. चर्चिल यांनी युगोडेपाच्या तिकिटावर एकेकाळी काँग्रेसचे एदुआर्द फालेरो यांचाही लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. आलेमाव यांची प्रतिमा अलीकडील काळात खूपच डागाळली. आलेमाव यांच्याप्रमाणेच रवी नाईक यांचीही कारकीर्द संपुष्टात आल्यासारखी स्थिती आहे. रवींचा फोंडा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर फोंडा पालिका निवडणुकीत रवींचा पुत्र रॉय नाईक हाही निवडून आला नाही. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत रवी नाईक यांना एवढी कमी मते मिळतील असे काँग्रेसमध्ये कुणाला वाटले नव्हते. काही काँग्रेस समर्र्थकांनीही रवी नाईक यांना मते दिली नाहीत. गृहमंत्री बनल्यानंतर ड्रग्सच्या विषयावरून विरोधकांनी केलेल्या गंभीर आरोपांत नाईक यांच्या प्रतिमेस जे तडे गेले, त्यातून पुन्हा त्यांची प्रतिमा सावरली नाही. आताचा युवा मतदार हा उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेसह सर्वच गोष्टींचा विचार करतो. अॅड. दयानंद नार्वेकर यांना प्रथम हळदोणे मतदारसंघात ग्लेन तिकलो यांनी सहज हरविले. काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर नार्वेकरांचे राजकीय वजन आणखी कमी झाले. त्यांना या वेळी लोकसभा निवडणुकीत केवळ चार हजार मते मिळाली. हळदोणेतही नगण्य मते मिळाली. यावरून त्यांचाही राजकीय काळ संपल्याचे स्पष्ट झाले. (खास प्रतिनिधी)