अनंत अग्नी, मुख्याध्यापक
गोवा शासनाने सध्या एका नव्या जिल्ह्याच्या निर्मितीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे वाटते. गोव्यासारख्या छोट्या राज्याला खरोखरच तिसऱ्या जिल्ह्याची गरज आहे का, हा खरा प्रश्न आहे. शासनाला तडकाफडकी हा निर्णय घेण्याची गरज का भासली, हे लोकांना समजणे हा त्यांचा अधिकार आहे. लोकहिताचे दूरगामी परिणाम असलेले निर्णय घेताना संबंधितांना विश्वासात घेणे हे शासनाचे नैतिक कर्तव्य आहे. कुणीही मागणी केलेली नसताना काणकोण, केपे, सांगे आणि धारबांदोडा या तालुक्यांचा समावेश असलेला नवीन जिल्हा स्थापन करण्यामागे शासनाचे प्रयोजन काय आहे, हे लोकांना पटवून देणे गरजेचे आहे.
गोव्यात सध्या दोन जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांची तुलना आपण शेजारील तीन जिल्ह्यांशी करूया. गोव्याच्या उत्तरेला असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ५२०७ चौ. किलोमीटर आहे. २०११ सालच्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ८,४९,६५१ इतकी आहे. ओरोस येथे या जिल्ह्याचे मुख्यालय असून तिथून सर्वात दूरचा मांगेली हे गाव १०० किमी अंतरावर वसलेले आहे. गोव्याच्या दक्षिणेला कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नडा जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १०,२९१ चौरस किलोमीटर इतके असून लोकसंख्या १४,३७,१६९ इतकी आहे. या जिल्ह्याचे मुख्यालय कारवार येथे असून सर्वात दूरचे भटकळ गाव १२३ किलोमीटर अंतरावर आहे. तर बेळगावी जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १३,४१५ चौरस किलोमीटर इतके असून लोकसंख्या ४७,७९,६६१ इतकी आहे. बेळगावी हे या जिल्ह्याचे केंद्र असून सर्वांत दूरचे अथणी हे गाव १५० किलोमीटरवर स्थित आहे. आता या तुलनेत गोव्याचे दोन्ही जिल्हे घेऊया.
दक्षिण गोव्याचे एकूण क्षेत्रफळ १९६६ चौरस किलोमीटर आहे, तर लोकसंख्या ६,४०,५३७. मडगाव शहरात या जिल्ह्याचे मुख्यालय असून दक्षिण टोकावरील पोळे गाव तिथून ५० किलोमीटर अंतरावर आहे. उत्तर गोवा जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७३६ चौरस किलोमीटर असून लोकसंख्या ८,१८,००८ इतकी आहे. पणजी या मुख्यालयापासून उत्तर टोकावरील पत्रादेवी गाव ३५ किलोमीटरवर आहे. गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांची शेजारच्या जिल्ह्यांशी तुलना केल्यास त्या जिल्ह्यांचे भौगोलिक क्षेत्रफळ, लोकसंख्या, मुख्यालयापासून शेवटच्या टोकावर असलेल्या गावाचे अंतर गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. त्यामुळे गोव्याला खरोखरच तिसऱ्या जिल्ह्याची गरज आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. देशातील अनेक जिल्ह्यांचे क्षेत्रफळ तसेच लोकसंख्या संपूर्ण गोवा राज्यापेक्षाही जास्त आहे.
मुळात प्रश्न असा आहे की, नव्या जिल्ह्याच्या स्थापनेसाठी जी शासकीय समिती घडविली होती त्यातील किती सदस्यांना गोव्याच्या भौगोलिक रचनेची कल्पना होती? नव्या जिल्ह्याचा हा आराखडा कार्यालयात बसून तयार केलेला आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागते आहे. नपेक्षा, काणकोण तालुक्यातील लोकांना अडचणीची होईल अशी नव्या जिल्ह्याची रचना झालीच नसती. दक्षिण गोवा जिल्ह्याचे सध्याचे मुख्यालय मडगाव शहरात आहे. मडगाव ही गोव्याची व्यावसायिक राजधानी आहे.
काणकोणमधून शेकडो लोक दररोज येथे व्यवसाय तसेच व्यापारासाठी येतात. खोतीगाव, गावडोंगरी, खोलासारख्या दुर्गम भागांतून आदिवासी महिला आपल्या शेतात पिकविलेली भाजी तसेच फळे येथील बाजारात आणून विकतात. काणकोणमध्ये नोकरी-धंद्याच्या जास्त संधी उपलब्ध नसल्याने गेली अनेक वर्षे मडगाव शहर काणकोणकरांसाठी रोजीरोटीचे शहर बनलेले आहे. काणकोणमधील व्यापाऱ्यांसाठी मडगाव हे खरेदीचे प्रमुख केंद्र आहे. मडगाव शहरात आल्यावेळी एका भेटीत काणकोणकर अनेक कामे उरकू शकतात.
मडगाव हे सध्याच्या दक्षिण गोवा जिल्ह्याचे केंद्र काणकोणकरांसाठी अनेक दृष्टींनी सोयीचे ठिकाण आहे. १९९३ साली श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाची स्थापना होइस्तोवर काणकोण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मडगाव हेच शिक्षणासाठीही प्रमुख केंद्र होते. अजूनही अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या ज्या शाखा काणकोणात उपलब्ध नाहीत, त्यासाठी मडगाव शहरावर विसंबून असतात. या शहराशी काणकोणवासीयांचे फक्त भावनिकच नव्हे तर व्यावहारिक नाते तयार झालेले आहे.
नोकरी, धंदा तसेच मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने काणकोण तालुक्यातील अनेक कुटुंबे मडगाव शहरात वास्तव्य करून राहतात. काणकोण तालुक्यातील सामान्य लोकांच्या जिल्हा कार्यालयांतील बऱ्याचशा कामांचा पाठपुरावा तेच करतात. त्याचा फायदा काणकोणात राहणाऱ्या सामान्य माणसाला होतो. काणकोणच्या एखाद्या व्यक्तीला उपचारासाठी मडगावच्या जिल्हा रुग्णालयात भरती केल्यास मडगावमध्ये राहणारे त्याचे काणकोणकर नातेवाईक किंवा शेजारी त्याच्या मदतीस धावतात.
काणकोण तालुक्याच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गावातून मडगावला यायला सार्वजनिक वाहतूक सुविधा सहज उपलब्ध आहे. त्या तुलनेत केपे, कुडचडेसारख्या शहरात फक्त काणकोणमधील शहरी भागातूनच आणि तीही तुरळक प्रमाणात वाहतूक सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे केपे हे जिल्ह्याचे मुख्यालय झाल्यास काणकोणच्या सामान्य जनतेवर बाळ्ळीपर्यंत एक बस आणि नंतर केपेपर्यंत - दुसरी, असा द्रविडी प्राणायाम करण्याची वेळ येणार आहे. 'फातर्फेच्यान गोंय लागीं' या कोंकणी म्हणीसारखी काणकोणकरांची गत होणार.
कोंकणी भाषेत एक म्हण आहे, 'यो वच कुसमणां, दीस गेलो जेवणां.' या म्हणीचा अर्थ असा की पोर्तुगीज काळात कुसमण म्हणजेच केपे शहरात शासकीय कार्यालये असायची. नेत्रावळी, रिवण इत्यादी दुर्गम भागातून लोक आपल्या कामासाठी कुसमणला पायी चालत यायचे. येताना दुपारचे जेवण बांधून आणायचे. हे लोक कुसमणला पोहोचेपर्यंत कार्यालये दुपारच्या जेवणासाठी बंद झालेली असायची. संध्याकाळी कार्यालये पुन्हा सुरू होईपर्यंत चार वाजलेले असायचे. परतीचा रस्ता घनदाट जंगलातून असायचा. हिंस्त्र श्वापदांचा धोका असायचा. त्यामुळे कामासाठी आलेली माणसे कार्यालये पुन्हा सुरू होण्याची वाट न पाहताच पुन्हा घरी परतायची. काणकोणवासीयांवर आता हीच पाळी येणार आहे.
शासन एका बाजूला 'प्रशासन तुमच्या दारी' म्हणून लोकांच्या दारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे, दुसऱ्या बाजूने वर्षानुवर्षे सहजपणे आणि सोयिस्करपणे चालत आलेली व्यवस्था मोडून लोकांसाठी नव्या अडचणी तयार करत आहे. तिसरा जिल्हा निर्माण करायचाच असेल, तर जरूर करा, पण काणकोण तालुक्याचा समावेश मडगाव मुख्यालय असलेल्या जिल्ह्यातच राहू द्या, ही काणकोणच्या जनतेची ठाम मागणी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. काणकोण तालुक्यातील प्रत्येक पंचायतीमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करून शासनाने लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याची गरज आहे.
लोकांच्या हिताचा निर्णय लोकांनाच घेऊ द्यावा, अशी शासनाला विनंती आहे. काणकोणकरांच्या लोकभावनेचा मान राखून शासन आपल्या निर्णयाचा फेरविचार करेल, असा काणकोणकरांना विश्वास आहे..
Web Summary : Goa's new district plan faces opposition. Concerns raised about necessity, public consultation, and Konkan residents' inconvenience. Madgaon's accessibility for Konkan is highlighted.
Web Summary : गोवा की नई जिला योजना का विरोध हो रहा है। आवश्यकता, सार्वजनिक परामर्श और कोंकण निवासियों की असुविधा पर चिंता जताई गई। कोंकण के लिए मडगांव की पहुंच पर प्रकाश डाला गया।