निसर्ग, संगीताने माझ्यात सृजनशील साहित्यिक जागा ठेवला: मुकेश थळी; 'लोकमत'शी खास संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2024 14:14 IST2024-12-19T14:13:55+5:302024-12-19T14:14:19+5:30
बुधवारी साहित्य अकादमीतर्फे पुरस्कांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये कोंकणी विभागात थळी यांची निवड करण्यात आली आहे.

निसर्ग, संगीताने माझ्यात सृजनशील साहित्यिक जागा ठेवला: मुकेश थळी; 'लोकमत'शी खास संवाद
अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : आजुबाजूस असलेल्या पूरक वातावरणामुळे माझ्यामध्ये एक कवी, लेखक जन्मजात होताच. म्हणूनच कदाचित दहाव्या वर्षी माझी साहित्यकृती नियतकालिकात प्रसिद्ध झाली. ज्ञानपीठकार रवींद्र केळेकरांचे घर हे माझे आजोळ. खरे तर इथूनच मला प्रेरणा मिळाली. केळेकर यांच्या घरी मोठ्या मोठ्या साहित्यिकांचे येणेजाणे असायचे. देश-विदेशातील दिग्गज साहित्यिक तिथे गप्पागोष्टी करताना पाहण्याचे भाग्य मिळाले आणि तिथूनच लिहिण्याची उर्मी जागृत झाली. अशा शब्दात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक मुकेश थळी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बुधवारी साहित्य अकादमीतर्फे पुरस्कांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये कोंकणी विभागात थळी यांची निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. तेव्हा ते बोलत होते. थळी पुढे म्हणाले, पाचवीत असल्यापासून लेखनाला सुरुवात झाली ती अजून पर्यंत सुरू असून थांबणारही नाही. केळेकर यांच्याकडून मला लिहिण्याचे बाळकडू मिळाले. निरंतर लिहीत गेलो. लहान असतानाच कौतुक व्हायला लागले. त्यामुळे स्वतःवरच एक जबाबदारी घालून घेतली की मी केळेकरांचा शिष्य आहे. आणि नियमितपणे साहित्य निर्मिती करत राहणार.
म्हार्दोळ प्रियोळ परिसरातील निसर्ग हा माझ्या लेखनाचा आणखी एक प्रेरणा स्तोत्र, ज्याने मला नेहमीच लिहिण्यासाठी प्रवृत्त केले. इथल्या सुंदर अशा मंदिरांनी चांगले लिहिण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. मंदिरातील विविध पारंपारिक वाद्यानी माझ्या लेखनाला लय दिली. मंदिरामध्ये दिग्गज शास्त्रीय गायक यायचे त्याच्या शास्त्रीय गायकीने शास्त्रोक्त लेखक जागृत केला.
तसे माझ्या घरातच संगीत नाट्य व इतर कलेंच्या देवतेचा वास आहे. त्यामुळेच त्या कलेच्या माध्यमातून साहित्यासाठी योगदान देत राहीलो, असेही ते म्हणाले. जेव्हा गोव्यात कोंकणी वर्तमानपत्रे सुरू झाली, त्यावेळी माझ्यातला लेखक मोठ्या ताकदीने लिहायला लागला. कारण त्यावेळी एक तळमळ होती. कोंकणी भाषेसाठी काहीतरी केले पाहिजे. त्या तळमळीतून कोंकणीतून अफाट लेखन केले. जो काही विषय मिळेल त्या विषयावर लिहित गेलो. कोंकणीत सर्व प्रकारचे सकस साहित्य निर्माण होते हा संदेश लोकापर्यंत जायला हवा म्हणून वेगवेगळे विषय हाताळले. कोंकणी वर्तमानपत्रे, मासिके यांच्या माध्यमातून कसदार साहित्य कुठेच कमी पडणार नाही याची काळजी घेत गेलो, असे थळी म्हणाले.
कोंकणीसाठी शक्य ते सर्व देणार
साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढलेली आहे. साहित्य क्षेत्रात असलेल्या युवकांना माझ्यापरीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. कोंकणी साहित्याला आम्हाला समृद्ध केले पाहिजे. त्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून जेवढे काही करता येईल तेवढे नक्की करेन, असेही थळी शेवटी म्हणाले.
कादंबरी लेखनाकडे वळणार
आज पर्यंत साहित्यातला प्रत्येक प्रकार हाताळला आहे. आगामी काळात एक चांगली कादंबरी माझ्याकडून निर्माण व्हावी, असे मी स्वतःलाच सांगितले आहे. तेसे वचन वाचकांनाही देत आहे. कादंबरी लेखनासाठी जो एक वेळ हवा तो कदाचित आता मला मिळू शकेल. नोकरीत असताना सर्वाधिक वेळ हा नोकरी व इतर साहित्य निर्मितीसाठी खर्च व्हायचा. कादंबरीसाठी ची बैठक हवी ती बैठक मिळत नव्हती. त्या बैठकीसाठी आतापासूनच मनाची तयारी सुरू केली आहे. काही दिवसात एक चांगली कादंबरी तुम्हाला नक्कीच मिळेल, असेही थळी म्हणाले.
आनंदासाठीच लिहितो
आज कोंकणी साहित्याला मौलिक नाटकांची गरज निर्माण झाली आहे. ती गरज भरून काढण्याचा माझ्याकडून लहानसा का होईना पण प्रयत्न नक्कीच होईल. जरी मी सर्व साहित्य प्रकार हाताळले असले तरी निबंध हा माझा सर्वात आवडता विषय आहे. निबंध लिहिताना त्यात स्वतः हरवून जातो. कालच्या पेक्षा आजचा निबंध कसा चांगला होईल याकडे लक्ष देतो. निबंधाच्या माध्यमातून एक विचार देण्याचा प्रयत्न माझ्याकडून होत असतो, असे सांगून ते म्हणाले, लोक विचारतात मी का लिहितो. एका वाक्यात सांगायचे तर मी आनंदासाठी लिहितो. लिहिताना मला आनंद मिळतो. माझी साहित्य कृती पूर्ण झाल्यानंतर परत एक वेगळाच आनंद मिळतो.