कर्नाटक, महाराष्ट्राने पळवले गोव्याचे पाणी: राजेंद्र केरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2025 12:58 IST2025-02-01T12:58:14+5:302025-02-01T12:58:55+5:30
येत्या काळात भीषण पाणीटंचाई

कर्नाटक, महाराष्ट्राने पळवले गोव्याचे पाणी: राजेंद्र केरकर
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : कळसा-भांडुरा प्रकल्पाद्वारे कर्नाटकाने तसेच विर्डी, सासोली, मणेरी व इतर जलप्रकल्पाद्वारे महाराष्ट्राने गोव्याचे पाणी पळविण्यासाठी षडयंत्र आखले आहे. अशातच तिळारीच्या पाण्याच्या भरोशावर अवलंबून असलेल्या गोव्याला सातत्याने पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. डिचोली, वाळवंटी व इतर नद्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे भविष्यात योग्य नियोजन केले नाही तर गोव्यावर मोठे पाणीसंकट ओढवले जाणार आहे, अशी भीती पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली आहे.
डिचोली येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केरकर यांनी तिळारी कालवा वारंवार फुटत असल्याने डिचोलीला सिंचनासाठी तसेच बार्देश, पर्वरी भागात पाण्याची टंचाई भासते. साळ येथे पंपिंग स्टेशन तसेच आमठाणे येथे पाणी साठवून अस्नोडा जलसाठ्चात पुरवण्याच्या सरकारने अनेक योजना आहेत. मात्र, त्यासंदर्भात गांभीर्याने ज्या गोष्टी करणे गरजेचे आहे, त्याबाबत योग्य ती दखल सरकारने घ्यावी.
डिचोली जीवनदायिनी असलेल्या नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सांडपाणी सोडणे, कचरा टाकणे, पूरप्रवण क्षेत्रात बांधकामांचे अतिक्रमण यामुळे डिचोली, वाळवंटी नदीवरही आक्रमणे व अनेक कारणास्तव संकट उद्भवले असून, त्यामुळे पडोशे जलशुद्धीकरण प्रकल्प, साखळी जलशुद्धीकरण प्रकल्प संकटात येण्याची भीती आहे.
सावध व्हावे...
म्हादईप्रश्नी सातत्याने सुनावणी पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे यासंदर्भात अद्याप ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. म्हादईचे पाणी कर्नाटकाने यापूर्वीच पळवले आहे. तर महाराष्ट्राने सासोली, मणेरी येथे पाणी अडवून ते वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी महाराष्ट्राने चंग बांधलेला आहे.