गोविंद गावडे यांची अग्नीपरीक्षा; २०२७ ची निवडणूक अतिशय महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 14:14 IST2025-06-22T14:14:24+5:302025-06-22T14:14:58+5:30

गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची वेळ एक दिवस मुख्यमंत्री सावंत यांच्यावर येईल असे २०२२ साली कुणाला वाटले नव्हते.

govind gawade ordeal and 2027 elections are very important | गोविंद गावडे यांची अग्नीपरीक्षा; २०२७ ची निवडणूक अतिशय महत्त्वाची

गोविंद गावडे यांची अग्नीपरीक्षा; २०२७ ची निवडणूक अतिशय महत्त्वाची

सारीपाट, सदगुरू पाटील, संपादक

गोविंद गावडे यांच्यासाठी २०२७ ची निवडणूक अतिशय महत्त्वाची असेल. नाजूक टप्प्यावर आता गोविंद उभे आहेत. मंत्रिपद नसते तेव्हा काहीजण हळूहळू नेत्याची साथ सोडत असतात. गोविंद गावडे हे पुढील दीड वर्ष कसे वागतात, मतदारसंघात लोकसंपर्क कसा ठेवतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. २०२७ साली भाजप-मगो युती असेल व त्यावेळी भाजपचे दिल्लीतील नेते प्रियोळविषयी काय निर्णय घेतात त्यावरदेखील बरेच काही अवलंबून आहे.

गोविंद गावडे आता ५३ वर्षांचे आहेत. त्यांना राजकारणात येण्यासाठी किंवा सक्रिय होण्यासाठी प्रारंभीच्या काळात रवी नाईक यांची मदत झाली. मग प्रत्यक्ष निवडणुकीवेळी त्यांना मनोहर पर्रीकर व भाजपनेही मदत केली. त्यावेळी मगोपचे दीपक ढवळीकर पराभूत व्हायला हवेत, असे पर्रीकर व भाजपचे उद्दिष्ट होते. ते साध्य झाले. त्यापूर्वीच्या काळात प्रियोळ मतदारसंघात (स्व.) काशिनाथ जल्मी विजयी होऊ नयेत अशी भाजपची इच्छा होती, प्रयत्न होता; तोही साध्य झाला. आता यापुढे गोविंद गावडे यांना शह देण्याचा प्रयत्न भाजपचे काही बडे नेते करतील. याचे संकेत मिळतातच. गोविंद गावडे भाजपमध्ये आहेत पण आता ते मनाने भाजपमध्ये नसतील असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. तूर्त कदाचित ते भाजपशी किंवा नेतृत्वाशी किंवा मुख्यमंत्र्यांशी संघर्ष करणार नाहीत. मात्र मनात संघर्ष सुरू असेल. गावडे यांना मोठे राजकीय भवितव्य होते व आहे पण त्यांची यापुढील वाट थोडी बिकट असेल. कसरतीची असेल. निमुळत्या वाटेवरून चालताना घसरून पडण्याचे प्रकार घडतात. गावडे यांची निमुळती वाट आता सुरू झाली आहे. अर्थात हे एक आव्हान आहे आणि कदाचित आव्हानावर मात करून पुन्हा ते स्वतः साठी अच्छे दिन आणू शकतात, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते. गोविंद गावडे लढवय्ये आहेत. एसटी समाज बांधवांचा पाठिंबा आणखी वाढवून ते परिस्थितीला टक्कर देऊ शकतील काय, हे यापुढील दिवसांत कळून येईनच.

गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची वेळ एक दिवस मुख्यमंत्री सावंत यांच्यावर येईल असे २०२२ साली कुणाला वाटले नव्हते. गोविंद गावडे यांची भेट भाजपचे बडे नेते अमित शहा यांच्याशी सावंत यांनी २०२२ च्या निवडणुकीपूर्वी घालून दिली होती. त्यानंतर गावडे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता. आपण अपक्ष राहतो, तुम्ही मला पाठिंबा द्या, तुम्ही वेगळा उमेदवार प्रियोळमध्ये घालू नका अशी विनंती अगोदर भाजपच्या स्थानिक नेत्यांना गावडे यांनी केली होती. मात्र तुम्ही कमळ निशाणीवरच लढायला हवे व त्यासाठी तुम्ही भाजपमध्ये या, असे गावडे यांना सांगितले गेले. गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुढील काळात संदीप निगळ्ये यांनी बंड करून आपला वेगळा मार्ग धरला. ते प्रियोळमध्ये अपक्ष लढले. पण जेवढी मते ते मिळवतील असे वाटले होते, तेवढी ते मिळवू शकेल नाहीत. त्यामुळे गोविंद गावडे यांचे नुकसान झाले नाही. 

मगोपतर्फे लढलेले दीपक ढवळीकर त्यावेळी २१३ मतांच्या फरकाने पराभूत झाले. गोविंद व दीपक दोघांनीही त्या निवडणुकीत धनशक्तीचा बराच वापर केला होता. गोविंदसाठी ती निवडणूक कठीण आहे, असे लोकांना वाटले होते. कारण त्यापूर्वी पाच वर्षे गावडे मंत्री होते. गावडे मंत्री या नात्याने कार्यक्षम होतेच, पण मतदारसंघात कोणत्याही आमदारासाठी पाच वर्षात नकारात्मक स्थिती निर्माण होत असते. सर्वांनाच नोकऱ्या मिळू शकत नाहीत. यामुळे युवक दूर जातात. गोविंद गावडे यांनाही तो अनुभव आलाच. गावडे यांचा पराभव होईल अशी हवा तयार झाली होती, पण भाजपच्या तिकिटावर २०२२ साली ते जिंकले. तत्पूर्वी ते अपक्ष निवडून आले होते.

गावडे हे प्रियोळ मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षांतील एकमेव राजकारणी आहेत, ज्यांना सलग आठ वर्षे मंत्रिपद मिळाले. दीपकलादेखील एवढी वर्षे मंत्रिपद मिळाले नाही किंवा तत्पूर्वी जल्मींनाही सलग आठ वर्षे मंत्रिपद मिळाले नव्हते. बाजूच्या कुंभारजुवेतून पूर्वी निवडून आलेल्या निर्मला सावंतनाही तसे आठ वर्षे वगैरे मंत्रिपद मिळाले नव्हते. गावडे नशिबवान ठरले असे अनेकजण म्हणतात. अगदी प्रमोद सावंत मुख्यमंत्री होण्याआधीच दोन वर्षे गावडे मंत्री झाले होते. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात त्यांनी काम केले. गावडे यांना एसटींमधूनही काहीजणांचा विरोध झालाच, राजकीय शत्रूही निर्माण झाले. 

काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांच्या विरोधात तर त्यांचा कायम संघर्ष झाला. प्रकाश वेळीप त्यांचे खास दोस्त बनले, पण उटाच्या चळवळीतील पूर्वीचे काहीजण गोविंदसोबत नाहीत गोविंद गावडे यांना अनेकदा मुख्यमंत्री सावंत यांनीच सांभाळून घेतले. कला अकादमीच्या वादात गावडे यांच्या विरोधात निर्माण झालेली स्थिती पाहून भाजपमधील काहीजणांनी दिल्लीत खूप तक्रारी केल्या होत्या. पूर्वीचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी गोविंद गावडे यांचे सख्य नव्हते. आताचे अध्यक्ष दामू नाईक यांनी तर गावडे यांना मंत्रिमंडळातून काढायलाच हवे अशी भूमिका घेतली होती. भाजपच्या कोअर टीममधील बहुतेक सदस्य गोविंद गावडे यांच्याकडून निदान कला अकादमी तरी काढून घ्या, असे मुख्यमंत्र्यांना वारंवार सुचवत होते. तरीही मुख्यमंत्र्यांनी कळ सोसली होती. मात्र उटाच्या कार्यक्रमात गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्यावर टीका करताच मुख्यमंत्री भडकले. हे खाते मुख्यमंत्र्यांकडेच आहे. या खात्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि मुख्यमंत्र्यांनी गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला.

गावडे यांच्यासाठी २०२७ ची निवडणूक ही मोठी अग्नीपरीक्षा असेल. नाजूक टप्प्यावर आता गोविंद उभे आहेत. मंत्रिपद नसते तेव्हा काहीजण हळूहळू नेत्याची साथ सोडत असतात. गोविंद गावडे पुढील दीड वर्ष कसे वागतात, मतदारसंघात लोकसंपर्क कसा ठेवतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. २०२७ साली भाजप-मगो युती असेल व त्यावेळी भाजपचे दिल्लीतील नेते प्रियोळविषयी काय निर्णय घेतात त्यावरदेखील बरेच काही अवलंबून आहे.

गावडे यापुढे काय करतील याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यांच्या विरोधकांचे व समर्थकांचेदेखील. यावेळी पहिल्यांदाच असे विधानसभा अधिवेशन येईल, ज्या अधिवेशनात गावडे आमदाराच्या भूमिकेत असतील. गोविंद गावडे राजकीयदृष्ट्या सध्या भाजपशी पंगा घेण्याच्या स्थितीत नाहीत. मात्र २०२७ ची निवडणूक ते भाजपच्याच तिकिटावर लढवतील असे समजण्यासारखी स्थिती नाही.

गावडे यांना परवा लोकमतच्या प्रतिनिधीने प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी गावडे यांनी आपण आपली भूमिका मांडीन, पण आपण भाजपमध्येच राहीन असे स्पष्ट केले आहे. आपण संघर्ष करणार नाही असेही नमूद केले आहे. प्रियोळ मतदारसंघात आपण भाजपचे काम जोमाने करत राहीन, असेही गावडे सांगतात. अर्थात हा त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो. त्यांना भाजपमध्येच आपण राहीन असे आभासी चित्र तयार करावेच लागेल. 

आपल्या मतदारसंघातील विकासकामांना खीळ बसू नये म्हणूनही गोविंद गावडे कदाचित मुख्यमंत्री सावंत यांच्याशी चांगलेच संबंध ठेवतील. उघड विरोधाची भूमिका घेणार नाहीत. कुडचडेचे नीलेश काब्राल यांनी मंत्रिपद गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी ठेवली होतीच. नंतर मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांशी जुळवून घेतले. संघर्ष केल्यास आपलीच हानी होईल हे काब्राल यांच्या नंतर लक्षात आले. मात्र काब्राल अजून दुखावलेले आहेत. गोविंद गावडेही दुखावलेले आहेत. दोघेही मंत्री म्हणून कार्यक्षम होते हे मान्य करावे लागेल. काब्राल यांना काढून मुख्यमंत्र्यांनी आलेक्स सिक्वेरा यांना मंत्री केले. सिक्वेरा हे काही कामाचे नाहीत असे लोक लगेच बोलू लागले. ते थकलेले आहेत. शिवाय आजारपणही मागे लागलेले आहे. निदान गोविंद गावडे यांच्या मंत्रिपदाच्या रिकाम्या जागी दुसरा कुणी आलेक्ससारखा थकलेला नेता मात्र मुख्यमंत्र्यांनी आणून बसवू नये.
 

Web Title: govind gawade ordeal and 2027 elections are very important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.