खाणींच्या प्रश्नावर सरकार उघडे पडले, गोव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची खरमरीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 18:59 IST2018-11-08T18:58:53+5:302018-11-08T18:59:02+5:30
खाणींच्या प्रश्नावर राज्यातील भाजप सरकार उघडे पडले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

खाणींच्या प्रश्नावर सरकार उघडे पडले, गोव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची खरमरीत टीका
पणजी : खाणींच्या प्रश्नावर राज्यातील भाजप सरकार उघडे पडले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. पर्रीकर व त्यांच्या कंपूने २00७ सालापासून राज्यातील खाणी बंद करण्याची मोहीम सुरू केली, त्यानंतर २0१२ साली ती प्रत्यक्षात आणून बहुजन समाजाच्या उत्पन्नाचे साधन हिरावून घेतले, असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.
केंद्रातही भाजपचीच सत्ता असल्याने गोव्यातील बंद खाणी पूर्ववत चालू करणे राज्य सरकारसाठी कठीण बाब नव्हती. वटहुकूमाच्या माध्यमातून हे शक्य होते परंतु केंद्रात बहुमत असलेल्या भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले. आतापर्यंत पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी खाण अवलंबितांची दिशाभूलच केली. मुख्यमंत्री, खासदार, सभापती यांनी दिल्लीवाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटी घेतल्या आणि राज्यातील खाणी सुरु होतील, असे आश्वासक चित्र निर्माण केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला बगल देण्यासाठी पळवाट काढली जाईल, असे सांगितले गेले. ही निव्वळ लोकांची दिशाभूलच होती.
गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना दिलेले निवेदनही हा देखील एक फार्स होता, अशी टीका चोडणकर यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश उचलून धरूनच गोव्यातील खाणी विनाविलंब पूर्ववत सुरू केल्या जाव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. केंद्रीय कायदामंत्री, आयुषमंत्री तसेच गोव्याच्या दोन्ही खासदारांनी लोकांचा विश्वासाात केल्याबद्दल तसेच अकार्यक्षमतेबद्दल राजीनामे द्यावेत, असे आवाहन चोडणकर यांनी केले आहे. २0१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने गोमंतकीय जनतेची दिशाभूल केली. आताही लोकांना मूर्ख बनविले. भाजपने खाणींच्या प्रश्नावर वटहुकूम आणि कायदेशीर तोडगा यातील फरक लोकांना आता समजावून सांगावा, असे उपरोधिक आवाहन चोडणकर यांनी केले. प्रत्येक निवडणुकीत खाणी पुढील मोसमात चालू होतील, असे आश्वासन देऊन भाजपने लोकांना फसविल्याचा आरोप त्यांनी केला.