चांगले दिवस येतील!

By Admin | Updated: May 19, 2014 01:30 IST2014-05-19T01:29:56+5:302014-05-19T01:30:35+5:30

साखळी : गोव्याच्या जनतेने पुन्हा एकदा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर विश्वास ठेवून लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजपाच्या उमेदवारांना निवडून दिले़ लोकसभा निवडणुकीच्या

Good days will come! | चांगले दिवस येतील!

चांगले दिवस येतील!

साखळी : गोव्याच्या जनतेने पुन्हा एकदा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर विश्वास ठेवून लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजपाच्या उमेदवारांना निवडून दिले़ लोकसभा निवडणुकीच्या काळात पर्रीकरांनी जनतेच्या मनाचा ठाव घेत खाण अवलंबितांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले़ त्यामुळे आता ‘चांगले दिवस येतील’ या आशेने जनतेने भाजपास भरघोस मते दिली़ मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या जनतेच्या मनावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आला. गोव्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी लोकसभेच्या प्रचारात जेथे जेथे मुख्यमंत्री गेले तिथे तिथे गोमंतकीयांनी प्रचंड गर्दी केली. गोव्यातील जनतेला भेडसावणार्‍या सर्व संकटांवर मात करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी प्रत्येक सभेत दिले. खाणबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या खाण अवलंबितांना कर्जमुक्त करून त्यांना दिलासा देणे, खाण मातीची वाहतूक करणारे ट्रकमालक कर्जबाजारी झाले आहेत़ त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू, बार्जमालक तसेच खाण कंपन्यात काम करणार्‍या कामगारांनी घेतलेले कर्ज, गॅरेजमालक, खाण उद्योगावर अवलंबून असलेले व्यावसायिक यांना कर्जमुक्त करून चांगले दिवस दाखविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवत भाजपाच्या राज्यातील दोन्ही उमेदवारांना निवडून दिले़ केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यास राज्याच्या विकासाला गती प्राप्त होणार असल्याचे पर्रीकरांनी सांगितले़ त्यानुसार देशात मोंदीचे सरकार आले असून त्यामुळे राज्यातील खाण अवलंबितांचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आता सर्वसामान्य बाळगून आहे़ त्यानुसार मनोहर पर्रीकरांनी प्रयत्न करण्याची गरज आहे़ गोव्यातील जनतेला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा शब्द म्हणजे ‘राम बाण’ असाच आहे. मुख्यमंत्र्यांनी मागितले आणि गोव्यातील जनतेने भरभरून दिले आहे़ त्यामुळे आता लोकांना दिलेल्या आश्वासनांचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने खाणींवर अवलंबून असलेल्यांना प्राधान्य देण्याची मागणी होत आहे़ खाण मातीची वाहतूक करणार्‍या ट्रकमालकांनी खाण व्यवसायाला आलेली तेजी पाहून आपला व्यवसाय वाढविण्यासाठी कर्जे घेऊन ट्रक खरेदी केले होते. बार्जमालकांनीही आपला व्यवसाय वाढविला होता तर खाण व्यवसायाशी निगडित असलेल्या व्यावसायिकांनीही बँकांकडून कर्ज काढून व्यवसायात सुधारणा केली होती; परंतु अचानक खाण बंद झाल्यामुळे खाण अवलंबितांची स्थिती ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली होती. गेली दोन वर्षे त्यांच्या धंद्यावर गंडांतर आले आहे. घेतलेले कर्ज भरून घेण्यासाठी बँकांनी कर्जदारांच्या मागे ससेमिरा लावला आहे. अन्य कुठलाही मार्ग आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी नसल्याने अनेकांनी आपले दागदागिने विकून उदरभरण करण्याचा खाटाटोप केला आहे. काहींनी आपल्या ट्रकांचे टायर विकून तर काहींनी आपल्या घरातील उपकरणे विकून मुलाबाळांचा सांभाळ करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच सरकारने याची दखल घेऊन चांगले दिवस आणावेत, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Good days will come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.