गोमंतकीयांच्या नजरा केंद्राकडे
By Admin | Updated: May 20, 2014 01:39 IST2014-05-20T01:30:00+5:302014-05-20T01:39:24+5:30
पणजी : मतदारांनी भरभरून कौल दिल्याने भाजपला आता निवडणूक काळात लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी लागणार आहे.

गोमंतकीयांच्या नजरा केंद्राकडे
पणजी : मतदारांनी भरभरून कौल दिल्याने भाजपला आता निवडणूक काळात लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी लागणार आहे. खाणबंदीची झळ पोचलेल्यांना खास पॅकेज, तसेच गोव्यातील जमिनी अबाधित राखण्यासाठी खास दर्जा ही दोन प्रमुख आश्वासने केंद्रातील मोदी सरकारला पूर्ण करावी लागणार आहेत. निवडणुकीपूर्वी दोन महिने आधी मेरशी येथे १२ जानेवारी रोजी झालेल्या विराट सभेत नरेंद्र मोदी यांनी गोव्याची अस्मिता जपण्यासाठी राज्याला खास दर्जा देणे आपल्याला मनापासून आवडेल. येथील जमिनी, अस्मिता, संस्कृती राखण्यासाठी खास दर्जाची मागणी आपण निश्चितपणे पूर्ण करीन, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. खाणी सुरू करण्यासाठी काँग्रेसने काहीच केले नाही. येथील लोकांना बेरोजगार केले, असा आरोप मोदी यांनी केला होता. त्यानंतर स्थानिक नेत्यांनीही पक्षाचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक व दक्षिण गोव्याचे उमेदवार अॅड. नरेंद्र सावईकर यांच्या प्रचारातही खाणींचा प्रश्न मार्गी लावू आणि केंद्रातून मोठे पॅकेज आणू, असे आश्वासन दिले होते. खाणींवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे; परंतु झळग्रस्तांना केंद्राकडून मिळणार असलेल्या पॅकेजची आशा आहे. जमिनी परप्रांतियांना विकता येऊ नयेत यासाठी गोव्याला खास दर्जाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. गोव्यातील जनतेचा हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. (प्रतिनिधी)