डिसेंबरपूर्वी राजभाषेचा दर्जा द्या: सुभाष वेलिंगकर; निर्धार समितीचा सभेतून सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 08:22 IST2026-04-12T08:21:52+5:302026-04-12T08:22:21+5:30
हा माय मराठीचा मराठी अस्मितेचा प्रश्न असल्याने सरकारला सज्जड इशारा देण्यात आला.

डिसेंबरपूर्वी राजभाषेचा दर्जा द्या: सुभाष वेलिंगकर; निर्धार समितीचा सभेतून सरकारला इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : मराठी ही सहभाषा नाही, हे सरकाराने आपल्या कृतीतून सिद्ध केलेले आहे. त्यामुळे आता नाही तर कधीच नाही, अशी वेळ आता मराठीप्रेमींवर आलेली आहे. जनता आता जागृत झालेली आहे. आता फक्त एकमेव पर्याय सरकारने निवडायचा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या अधिवेशनात मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी योग्य दुरुस्ती कायद्यात करावी, दर्जा देणारा ठराव मंजूर करून केलेला अन्याय दूर करण्यात यावा. मात्र, मराठीला डावलण्याचा प्रयत्न झाल्यास कुठल्याही सरकारला भविष्यात टिकू देणार नसल्याचा सज्जड इशारा म्हापसा येथील मराठी राजभाषा निर्धार समितीच्या सभेतून देण्यात आला.
मराठीशी, मराठीच्या जिवाशी, लोक जीवनाशी, लोकांच्या अपेक्षांशी, संस्कृतीशी आणखी खेळू नका, याच वर्षी मराठी राजभाषा होईल, असा विश्वास व्यक्त करून मराठीशी खेळू पाहणाऱ्या सरकारला अद्दल घडवूया. हा माय मराठीचा मराठी अस्मितेचा प्रश्न असल्याने सरकारला सज्जड इशारा देण्यात आला.
अधिवेशनापूर्वी महासभेचे आयोजन केले जाणार असून, मराठी व्होट बँक तयार केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी राजभाषा निर्धार समितीच्यावतीने शनिवारी म्हापसा येथील राममनोहर लोहिया उद्यानात भव्य जाहीर सभेचे आयोजन केले होते. तत्पूर्वी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे नंतर सभेत रूपांतर करण्यात आले. राजभाषा चळवळीतील ज्येष्ठ नेते स्व. शशिकांत नार्वेकर यांचे व्यासपीठाला नाव देण्यात आले होते.
यावेळी राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर, प्रमुख मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, ज्येष्ठ मराठी नेते रमेश नाईक, राज्य मातृशक्ती सहप्रमुख अॅड. रोशन सामंत, विद्या डिचोलकर, विनायक च्यारी, सुजन नाईक, प्रा. गजानन मांद्रेकर, शरद गावडे, उमेश म्हालकर, अशोक नाईक, प्रणव बाणावलीकर, बार्देश प्रखंड प्रमुख नारायण राठवड, परेश रायकर, मुकुंद कवठणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठीप्रेमी लाचार नव्हेत
प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले, मराठीवर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारची विधानसभेतील संख्याबळ २७ वरून १३ वर आणण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मराठीप्रेमी लाचार नसून स्वाभिमानी आहेत. त्यामुळे ही संख्या शून्यावर आणण्यासाठी मागे पुढे पाहणार नसल्याचे वेलिंगकर म्हणाले.
चूक सुधारावी : ढवळीकर
गोव्याची संस्कृती मराठी भाषेने जपली आहे. मात्र राजभाषेचा दर्जा असलेल्या कोंकणी भाषेचा कुठेच वापर केला जात नाही. कोंकणी भाषेची वाढ कधीच झाली नाही किंवा या भाषेचा वापर कुठेच केला जात नसल्याचे ढवळीकर म्हणाले. खोटी आश्वासने देऊन दिल्लीत फसवणूक करून कोंकणी राजभाषा करण्यात आली आहे.