वनाधिकारी, पोलिसांसोबत ग्रामस्थांची हमरीतुमरी
By Admin | Updated: December 26, 2014 02:09 IST2014-12-26T02:08:03+5:302014-12-26T02:09:55+5:30
बेळगाव : जांबोटी-भीमगड अभयारण्यात सोडलेल्या नरभक्षक वाघाने जांबोटी-माजिवडे गावातील अंजना हनबर (२३) या महिलेला ठार केले.

वनाधिकारी, पोलिसांसोबत ग्रामस्थांची हमरीतुमरी
बेळगाव : जांबोटी-भीमगड अभयारण्यात सोडलेल्या नरभक्षक वाघाने जांबोटी-माजिवडे गावातील अंजना हनबर (२३) या महिलेला ठार केले. त्यानंतर या महिलेचा मृतदेह शोधण्याच्या मोहिमेदरम्यान वाघावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचा आरोपावरून जांबोटी-माजिवडे ग्रामस्थांमध्ये व संबंधित अधिकाऱ्यांत जोरदार हमारीतुमरी झाली.
संतप्त लोकांनी पोलीस वनाधिकाऱ्यांवर दगडफेक केली. यात ६ पोलीस किरकोळ जखमी झाले. कर्नाटकातील चिक्क-मंगळुरूमधून बेळगावजवळील जंगलात सोडलेल्या वाघाला स्थलांतरित करावे, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, तिचा मृतदेह शोधण्यासाठी वनाधिकारी तसेच पोलिसांनी बुधवारी रात्रीपासूनच मोहीम हाती घेतली होती.
गुरुवारी सकाळी मृतदेह माजिवडे जंगलात २ किलोमीटर आत आढळला. वाघाने त्या महिलेच्या अंगाचे लचके तोडले होते.
दरम्यान, संबंधित अधिकारी या वाघाला पकडतात का आणि खानापूर तालुक्यातील २५ गावांतील शेतकऱ्यांच्या मनातील भीती कधी दूर करतात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)