कॉँग्रेस नेत्यांच्या अनास्थेमुळेच पानिपत
By Admin | Updated: May 19, 2014 01:30 IST2014-05-19T01:28:48+5:302014-05-19T01:30:44+5:30
मडगाव : दक्षिण गोव्यात कॉँग्रेसचे पानिपत होण्यामागे चर्चिल आलेमाव व माविन गुदिन्हो यांचे उघड बंड कारणीभूत असले तरीही इतर कॉँग्रेस नेत्यांनी दाखवलेली

कॉँग्रेस नेत्यांच्या अनास्थेमुळेच पानिपत
मडगाव : दक्षिण गोव्यात कॉँग्रेसचे पानिपत होण्यामागे चर्चिल आलेमाव व माविन गुदिन्हो यांचे उघड बंड कारणीभूत असले तरीही इतर कॉँग्रेस नेत्यांनी दाखवलेली अनास्थाच या बिकट परिस्थितीला अधिक कारणीभूत असल्याचे म्हणावे लागेल. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही या वेळी फारशी हालचाल केली नाही हे मडगावात भाजपाने घेतलेल्या आघाडीनेच स्पष्ट केले आहे. कॉँग्रेसचे उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी यावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. मला फक्त भाजपाविरुध्दच लढावे लागलेले नाही, तर स्वकीयांविरुध्दही लढावे लागले, असे ते म्हणाले. बाणावली, कुंकळ्ळी, सांगे, सावर्डे या भागात जणू कॉँग्रेसचे अस्तित्वच नव्हते, अशी परिस्थिती या निवडणुकीत दिसून आली. एक विजय सरदेसाई सोडल्यास कॉँग्रेसबरोबर संघटनाच नव्हती, असे मत राजकीय विश्लेषक असलेले प्रभाकर तिंबले यांनी व्यक्त केले. ही निवडणूक भाजपा विरुद्ध कॉँग्रेस अशी होण्यापेक्षा भाजपा विरुद्ध रेजिनाल्ड अशी झाली, असे तिंबले म्हणाले. तर दुसरे राजकीय विश्लेषक अॅड. क्लिओफात कुतिन्हो यांच्या मते, कॉँग्रेस संघटनाच विस्कळीत झाल्यामुळे एक सासष्टी सोडल्यास कुठेच कॉँग्रेसचा प्रभाव जाणवला नाही. केपे मतदारसंघात आमदार बाबू कवळेकर यांनी कॉँग्रेससाठी बर्यापैकी काम केले. मात्र, पंचायत क्षेत्रात त्यांची जादू न चालल्यामुळे या मतदारसंघातही कॉँग्रेसला १७२१ मतांनी मागे राहावे लागले. काणकोण व कुडचडेतही कॉँग्रेसचा फारसा प्रभाव दिसला नाही. कॉँग्रेसच्या या परिस्थितीबद्दल मत व्यक्त करताना जिल्हा अध्यक्ष सुभाष फळदेसाई म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यात कॉँग्रेस सत्तेवर होती. त्यामुळे निवडणुकीसाठी निधीची कमतरता फारशी जाणवली नाही. मात्र, या निवडणुकीत पैसे कमी पडल्याने कॉँग्रेसला पिछाडीवर जावे लागले. असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)