थेट रक्कम नाही तर कार, फ्लॅट स्वरूपात घेतला जातोय 'हुंडा'
By समीर नाईक | Updated: June 8, 2025 09:09 IST2025-06-08T09:08:28+5:302025-06-08T09:09:40+5:30
गोव्यातही अप्रत्यक्षपणे हुंडा घेणे सुरूच : अमानुष छळाच्या घटनांची मात्र नाही

थेट रक्कम नाही तर कार, फ्लॅट स्वरूपात घेतला जातोय 'हुंडा'
समीर नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: देशभरात लग्नात हुंडा न दिल्याने होणारे महिलांचे छळ व शेवटी विवाहितेच्या जिवावर बेतल्याच्या घटना वाढत असताना, सुदैवाने गोव्यात मात्र असे टोकाचे छळ झाल्याच्या घटना नाहीत. मात्र, हुंडा घेतलाच जात नाही, असेही नाही. गोव्यात अप्रत्यक्षपणे मोठा हुंडा घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
आता हुंडा म्हणून कोणी थेट रक्कम मागत नाही तर हुंड्याचे स्वरूप बदलले आहे. दिल्या घरी आपली मुलगी सुखी राहावी, या प्रांजळ भावनेपोटी मुलीचे आई-वडील सर्व पुरवत असतात. गोव्यातही हुंडा घेतला जातो. मात्र, त्याचे स्वरूप बदलल्याची माहिती मिळाली आहे. रकमेच्या बदल्यात लाखो रुपयांच्या वस्तू आता भेट म्हणून दिल्या जात आहेत. गाडी, फ्लॅट, व्यावसायासाठी आर्थिक मदत, अशा प्रकारे हा हुंडा पुरवण्यात येत आहे. जेव्हा लग्नाची बोलणी सुरू असते, तेव्हाच 'अप्रत्यक्ष हुंड्याबद्दल' ही ठरते.
ईर्ष्या वाढली
सध्या अलिशान आणि सर्वात हटके लग्न सोहळे करण्यासाठी युवक-युवतींचा कल वाढलेला दिसत आहे. मित्रांमध्ये जर कुणी वेगळ्या पद्धतीने लग्नसोहळा केला, तर त्यापेक्षा अधिक वेगळे आपण काय करू, अशी ईर्ष्याच सुरू आहे. मग, त्यासाठी आई-वडिलांना कितीही आर्थिक कसरती करावा लागल्या, तरी त्याचा विचार केला जात नाही.
खर्चाची लाखोंची उड्डाणे...
लग्नातील विविध ट्रेंड पाहता एका लग्नाला कमीतकमी १५ ते २० लाख रुपये खर्च येत असतो, असे काही पालक, युवा जोडप्यांशी संवाद साधल्यावर समोर आले. दाग-दागिने वगळून केलेला हा खर्च असतो. मग त्यात प्री-वेडिंग, हळद समारंभ, संगीत समारोह, जेवण, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, कपडे यांचा खर्च लाखोंची उड्डाणे घेत आहे. अनेकजण तर प्री-वेर्डीग किंवा हळदी समारंभासाठी चार ते पाच लाख रुपये खर्च करतात. लग्नातील जेवण्याचे दर जवळपास दोन लाखांच्यावर पोहोचले आहेत.
पूर्वीसारखे थेट हुंड्याचे प्रकार आता राहिलेले नाहीत. पण, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात हुंडा दिलाच जातो. तसेच, लग्न सोहळेही खर्चिक झाले आहेत. समाजातील प्रतिष्ठेसाठी लग्न सोहळे मोठे व्हायचे आता सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेण्यासाठीही सोहळे भव्यदिव्य केले जात आहेत. अनेक लग्न सोहळे कर्ज काढून केली जातात आणि हे थांबायल हवे. नव्या पिढीने अवाढव्य खर्च टाळावा. - नमन सावंत, साहित्यिक