गुन्हे, दरोड्यांचे वर्ष
By Admin | Updated: January 9, 2015 02:15 IST2015-01-09T02:12:33+5:302015-01-09T02:15:06+5:30
तपासातही प्रगती : गंभीर अपघात वाढले; नशेबाज चालकांच्या प्रमाणात वाढ

गुन्हे, दरोड्यांचे वर्ष
पणजी : मावळते वर्ष हे गुन्हेगारीचे आणि अपघाती मृत्यूचे ठरल्याचे पोलीस खात्याच्या नोंदींवरून स्पष्ट झाले आहे. गुन्ह्यांचे प्रमाण मावळत्या वर्षी ३.५ टक्के वाढले. या पार्वभूमीवर पोलिसांची ५.६७ टक्के तपास क्षमता ही दिलासादायक आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक व्ही. रंगनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळत्या वर्षी ४४६६ गुन्ह्यांची नोंद झाली. २०१३ वर्षी ती ४३१२ एवढी होती. गुन्हेगारी वाढली असली, तरी तपासाचे प्रमाणही वाढल्यामुळे उपमहानिरीक्षकांनी समाधान व्यक्त केले. गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात अल्प अशी १.८ टक्के घट झाली. अतिगंभीर तक्रारीच्या तपासात या वर्षी गती प्राप्त झाली नाही. उलट ०.६ टक्क्याने ती कमी झाली आहे.
मावळत्या वर्षात अपघात किंचित कमी झाले आहेत; परंतु झालेले अपघात हे मोठ्या प्रमाणावर जीवघेणे अपघात ठरले आहेत. अपघातांचे प्रमाण दीड टक्क्याने कमी झाले आहे, तर अपघाती मृत्यूचे प्रमाण १३.६ टक्क्यांनी वाढले आहे. नशेत वाहने चालविण्याची प्रकरणे जी २०१३ मध्ये केवळ ३६२ एवढी आढळली होती, ती मावळत्या वर्षी ३३३४ एवढी नोंद झाली आहेत.
महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या १०९१ या हेल्पलाईनचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे रंगानाथन यांनी सांगितले. मावळत्या वर्षात या क्रमांकावर संपर्क करून मदतीसाठी याचना करणारे एकूण ३०४ फोन आल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसाठी प्रत्येक पोलीस स्थानकांत हेल्पडेस्क सुरू करण्याची घोषणाही खात्याने केली आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी १०९० हेल्पलाईन जारी करण्यात आली असून आतापर्यंत २९ कॉल्स त्यावर नोंद झाले आहेत. हायवे पेट्रोलिंगसाठी १० वाहनांची सोय, पर्यटकांच्या मदतीसाठी विशेष हेल्पलाईन या गोष्टी मावळत्या वर्षीच्या उजव्या बाजू आहेत.
पोलीस खात्याने स्वतंत्र सायबर विभाग सुरू करून अधिसूचित केल्यानंतरही या विभागात पुरेसे मनुष्यबळ पुरविण्यात आलेले नाही. शिवाय आवश्यक साधनसुविधाही अद्याप देण्यात आलेल्या नाहीत. सायबरलॅबचा प्रस्तावही खितपत पडला आहे. असे असतानाही तुटपुंज्या साधनसुविधांनी कार्यरत असलेल्या या विभागाने लक्षणीय कामगिरी बजावली आहे. वेबसाईट हॅकिंग प्रकरणे, ३५ लाख रुपयांचा बँकेला गंडा घालण्याचे प्रकरण, फेक प्रोफाईल करून बदनामी करण्याची प्रकरणे यांसह अनेक प्रकरणे या विभागाने यशस्वीपणे धसास लावली आहेत.
(प्रतिनिधी)