जुनेगोवेत कचरा प्रकल्प विरोध
By Admin | Updated: May 19, 2014 01:30 IST2014-05-19T01:28:02+5:302014-05-19T01:30:53+5:30
तिसवाडी : जुनेगोवे पठारावर कचरा प्रकल्प उभारण्यासाठी सरकार व पणजी नगरपालिका पुन्हा प्रयत्न करीत असल्याने यास प्रखर विरोध दर्शविण्यासाठी १ जून रोजी खास ग्रामसभा घेण्याचा ठराव

जुनेगोवेत कचरा प्रकल्प विरोध
तिसवाडी : जुनेगोवे पठारावर कचरा प्रकल्प उभारण्यासाठी सरकार व पणजी नगरपालिका पुन्हा प्रयत्न करीत असल्याने यास प्रखर विरोध दर्शविण्यासाठी १ जून रोजी खास ग्रामसभा घेण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. तसेच आसपासच्या पंचायतींतील नागरिक, पंच, सरपंचांना या सभेस निमंत्रित करण्याचेही या वेळी ठरले. सरपंच मनीषा कुट्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ही ग्रामसभा पंचायत सभागृहात झाली. कुट्टीकर यांनी स्वागत केले. सचिव अशिष नाईक यांनी मागील सभेचा अहवाल वाचून दाखविला व त्यास मान्यता देण्यात आली. जुनेगोवे पठारावरील कचरा प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या जागेस आता इंडस्ट्रियल झोन घोषित करावा, अशी मागणी पणजी नगरपालिकेने केल्याने व सरकारनेही यासाठी सहमती दर्शविल्याने कचरा प्रकल्प या जागेवर निश्चित येणार असल्याची भीती चर्चचे फादर व इतर नागरिकांनी व्यक्त केली. या कचरा प्रकल्पावर चर्चेचा मुद्दा ग्रामसभेच्या अजेंड्यात नसल्याने तसेच ग्रामसभेस जेमतेम ४० नागरिक उपस्थित असल्याने या मुद्द्यावर चर्चा व ठराव घेण्यासाठी खास ग्रामसभा बोलविण्यात यावी, असा ठराव चर्चचे फादर तथा या कचरा प्रकल्पासाठी विरोध करणारे कमिटी सदस्य मोन्तेरो यांनी माडला. यास उपस्थित नागरिक व पंचांनी सर्वानुमते अनुमती दिली. श्यामसुंदर कामत यांनी सांगितले की, कचरा प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्यासाठी कायद्यानुसार पंचायतीचा ठराव आवश्यक आहे. मात्र, सरकारची कृती बेकायदेशीर ठरत आहे. अॅड. इनासियो ब्रागान्झा यांनी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी एखादा २० वर्षे उच्च न्यायालयाचे ज्ञान असलेल्या वकिलाचा सल्ला घेण्याची विनंती केली. यासाठी जादा पैसे मोजावे लागले तरी चालेल, कायद्याची लढाई आवश्यक असल्याचे ते म्हणाले. गांधी हन्रींक यांनीही पणजी नगरपालिका व सरकारच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली व यासाठी सरकारशी प्रखर लढा देण्याचे आवाहन केले. बर्नाडेट फर्नांडिस यांनी पंचायत सचिव ग्रामसभेतील मुद्दे ग्रामसभेत न लिहिता आपल्या मर्जीनुसार लिहीत असल्याचा आरोप केला. गेल्या ग्रामसभेत पंच विशाल वळवईकर गैरहजर असताना हजर असल्याचे त्यांनी इतिवृत्तात लिहिले असल्याचा आरोप केला. या वेळी पंच वळवईकर यांनी गेल्या ग्रामसभेत आपण हजर असल्याचे सांगितले. तसेच ग्रामसभेतील अहवाल ग्रामसभेत लिहिला जाईल, असे आश्वासन सचिवाने या वेळी ग्रामस्थांना दिले. मागील ग्रामसभेतील अनेक विकासकामांसंबंधीचा पत्रव्यवहार संबंधित खात्याशी केला असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ही कामे होऊ शकली नसल्याचे सरपंच कुट्टीकर यांनी या वेळी सांगितले. ग्रामस्थांनी पंचायत क्षेत्रात वाहन पार्किंगसाठी जागेची टंचाई असल्याने अरुंद असलेल्या मुख्य रस्त्यावर आणखी गाड्यांना परवानगी न देण्याचा ठराव घेऊनही याचे उल्लंघन होत असल्याचे नजरेस आणून दिले असता, यापुढे असे प्रकार होऊ दिले जाणार नसल्याचे आश्वासन कुट्टीकर यांनी दिले. जुनेगोवे पंचायत क्षेत्रातील खराब रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करूनही ही कामे न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ही सर्व कामे पावसाळ्यानंतर लगेच हाती घेतली जातील व फेस्तापूर्वी पूर्ण केली जातील, असे सरपंच कुट्टीकर यांनी सांगितले. दरम्यान, जुनेगोवे पंचायतीची ग्रामसभा असूनही सभागृहातील बहुतेक पंखे बंद होते. यावर नागरिकांनी सरपंचांना विचारले असता, ते दुरुस्त केले जातील, असे त्यांनी सांगितले. तर काहींनी हे पंखे मुद्दामहून बंद केले असून ग्रामस्थ गर्मीने बेजार होऊन परत जाण्यासाठी हा प्रयोग केला असल्याचे सांगितले. या वेळी व्यासपीठावर सरपंचांसोबत पंच विशाल वळवईकर, विनायक फडते, गीता पर्वतकर, प्रकाश आमोणकर व झेवियर फियोलो उपस्थित होते. (प्रतिनिधी)