गोव्याच्या जैवविविधतेचे संवर्धन करा!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 11:36 IST2025-05-23T11:35:18+5:302025-05-23T11:36:22+5:30
साखळी येथे राज्य जैवविविधता पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

गोव्याच्या जैवविविधतेचे संवर्धन करा!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: गोवा हे जैवविविधतेचा खजिना असलेले राज्य आहे. पण आज दुर्मिळ ठेवा नष्ट होताना दिसत असून त्याचे संवर्धन करण्यासाठी राज्यातील प्रत्येकाचे सहकार्य महत्त्वाचे आहे. गोवा जागतिक पातळीवर जैवसंपदा राज्य करण्याचा आमचा निर्धार आहे. त्यासाठी लोकसहभागाची गरज असून सरकारने आतापर्यंत सात ठिकाणी जैवविविधता केंद्र सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
साखळी रवींद्र भवनमध्ये आज, गुरुवारी आयोजित जागतिक जैवविविधता दिन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. श्रीधर ठाकूर, डॉ. अर्चना गोडबोले, सिद्धी प्रभू, लेवीन्सन मार्टिन्स, सचिन देसाई, जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम, संदीप फळदेसाई, विजयकुमार नाटेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील जैव संरक्षणासाठी कार्य केलेल्या मान्यवरांना जैवविविधता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दुर्मिळ वनस्पती, जीवजंतू सांभाळणे गरजेचे आहे. गोव्यातील विविध भागात असलेले कडधान्य, पालेभाजा, कंदमुळे, औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती या लोप पावत असल्याची भीती व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी नव्या पिढीसाठी हा ठेवा जपण्याचे आवाहन केले.
दरम्यान, डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी स्वागत केले. सिद्धी प्रभू, डॉ. सिद्धार्थ ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. तर सचिन देसाई यांनी आभार मानले. राज्यात मोठ्या प्रमाणात जैवसंपदा आहे. याचे रक्षण करणे प्रत्येक गोमंतकीयाची जबाबदारी आहे. सरकार विविध उपक्रमांच्या माध्यमातून राज्यातील जैवविविधतेचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, याला गोमंतकीयांनी साथ दिल्यास मोठे स्वरूप प्राप्त होईल. त्यामुळे शाळा, महाविद्यालयातही जैवविविधतेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता आणावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून जैवविविधतेचे महत्त्व समजावून सांगण्यी गरज आहे. निसर्गचक्रातील प्रत्येक घटक किती आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना पटवून सांगा. जैवविविधतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येक गोमंतकीयांने उचलण्याची गरज आहे. स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न साकारत असताना गोव्याचे नैसर्गिक संपदाही जपण्याची गरज मुख्यमंत्री सावत यांनी व्यक्त केली.
साडेसहा लाख वृक्ष लागवड
यावेळी डॉ. प्रदीप सरमोकदम यांनी साडेसहा लाख वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत विविध उपक्रम राबवून जैवविविधतेला चालना देण्यात आल्याचेही सांगितले.
मिठागृह, जैविविविधता नोंदणी तसेच जैवविविधता अॅक्शन प्लान तयार करणे आदी माध्यमातून काम सुरू असल्याचे सांगितले.
राज्यातील डोंगर भागांचे सरंक्षण करण्यासाठी सरकारने विशेष उपक्रम हाती घेतला असून गोमंतकीयांनी साथ देण्याचे आवाहन समोकदम यांनी केले आहे.
प्लास्टिक टाळा
राज्यातील पारंपरिक शेती, कुळागरे, खाजन आदी अनेक जैविक संपदा आमच्या पूर्वजांनी राखून ठेवण्याचे काम केलेले आहे. कुळागरात विविध पिके घेणे शक्य आहे. निसर्गाशी समन्वय साधून तो टिकवणे गरजेचे आहे. प्लास्टिक बंद करून पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी कार्यरत राहावे, गोव्यात अभयारण्य पाहण्यासाठी लोक तसेच जैविक संपत्तीचा खजिना असलेल्या गोव्याला नवी ओळख करून देण्यासाठी जैवविविधता ठेवा सांभाळणे गरजेचे आहे
मिठागरे नव्याने सुरू करू
संपूर्ण गोवा हरित व्हावा माध्यमातून सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मायनिंगचे डंप हरित करण्यावर प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक तालुक्यात एका नव्या जैविक पदार्थाची ओळख व्हावी यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत. गोव्यात अॅग्रो क्लिनिक जूनपासून सुरू होणार असून लवकरच मिठागरे नव्याने सुरू करण्याचा घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी राज्यातील विविध क्षेत्रात जैवविविधता संवर्धनासाठी काम करणाऱ्या मान्यवरांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराने गौरवण्यात आले.
सत्कारमूर्ती...
विठ्ठल अनंत जोशी, गणेश शंकर शेटकर, दत्ताराम गोपाळ सरदेसाई, आनंद मेळेकर, लिलावती उसगावकर, नवो पावनो, फादर सिरियाक जेम्स, कमलाकांत सावळो तारी, देवेश नाईक, जहीर करमली, डोमिंगोस आर्केडिओ फर्नांडिस, राजेंद्र वेळीप, रॉय बार्रेटो, नेस्टर फर्नांडिस, पिओ प्रॅक्सेडीज ज्युलिओ क्चॉद्रोस, डॉ. श्रीकनाथ जी.बी., गोपीनाथ विष्णू गावस, मांगीरीश धारवाडकर, राहुल कुलकर्णी, वहाब खान, आरती दास यांचा समोवश आहे.