काँग्रेसने बदलायला हवे : रेजिनाल्ड

By Admin | Updated: May 20, 2014 01:38 IST2014-05-20T01:33:20+5:302014-05-20T01:38:51+5:30

मडगाव : दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची जी वाताहात झाली, त्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकारिणीत आमूलाग्र बदल करण्याची मागणी वाढू लागली आहे.

Congress should change: Reginald | काँग्रेसने बदलायला हवे : रेजिनाल्ड

काँग्रेसने बदलायला हवे : रेजिनाल्ड

मडगाव : दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची जी वाताहात झाली, त्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकारिणीत आमूलाग्र बदल करण्याची मागणी वाढू लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहिल्यास दक्षिण गोव्यात काँग्रेसमध्ये ७५ टक्के बदल करायला पाहिजे, असे मत लोकसभेचे उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी व्यक्त केले. या निवडणुकीत कित्येक काँग्रेस नेत्यांनी काँग्रेससाठी काम केले नाही. काही ठिकाणी काँग्रेसचे निर्णयही पक्षाच्या विरोधात गेले. मुरगाव तालुक्यात दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांनी पक्षाच्या विरोधात केलेली विधाने या तालुक्यात काँग्रेसला पिछाडीवर आणण्यास कारणीभूत ठरली तर मडकई, सावर्डे, सांगे या भागात काँग्रेसकडे कसली संघटनाच नव्हती. त्यामुळे या सर्व बाबींकडे लक्ष देऊन नवीन बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आज जरी राज्यात आणि संपूर्ण देशातही भाजपाचे वारे असले तरी येत्या दोन वर्षांत हे वारे बदलणार आहे. त्याचा फायदा उठविण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच तयारी केली पाहिजे, असे रेजिनाल्ड म्हणाले. ज्या आजी-माजी आमदारांना मतदारांनी नाकारले आहे, त्या मतदारसंघांत आता नवीन चेहरे काँग्रेसने शोधण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस सरकारच्या विरोधात मागच्या वेळी जसे वारे निर्माण झाले होते, तीच वेळ आणखी दोन वर्षांनी भाजपावर येणार आहे. मात्र, त्याचा फायदा उठविण्यासाठी काँग्रेस संघटना मजबूत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दक्षिण गोव्याचे जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांना विचारले असता, निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेण्यासाठी येत्या दोन दिवसांत काँग्रेस गटाध्यक्षांची बैठक बोलविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी जर बदल घडवून आणायचे असतील तर त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. बाणावली, कुंकळ्ळी, नावेली, दाबोळी तसेच अन्य मतदारसंघांत मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची वाताहात झाली असली तरी सासष्टीत विधानसभेच्या तुलनेत काँग्रेसची स्थिती सुधारली आहे. नुवे मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य विल्फ्रेड डिसा यांच्या रूपात नवीन नेतृत्व पुढे येत आहे. कुंकळ्ळीतही ज्योकिम आलेमाव यांना पर्याय म्हणून नवीन नावे पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसमध्ये काही बदल होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Congress should change: Reginald

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.