जातीनिहाय गणना काळाची गरज: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; दिल्ली भेटीत विकसित गोव्याच्या योजना मांडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 07:13 IST2025-05-27T07:11:47+5:302025-05-27T07:13:07+5:30
मुख्यमंत्री डॉ. सावंत रविवारी दुपारी दिल्ली येथील एनडीए बैठक आटोपून थेट मये महोत्सवासाठी उपस्थित राहिले होते.

जातीनिहाय गणना काळाची गरज: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; दिल्ली भेटीत विकसित गोव्याच्या योजना मांडल्या
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: देशात जातीनिहाय जनगणना करणे काळाची गरज होती. त्यामुळे सामाजिक, आर्थिक स्तर स्पष्ट होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले पाऊल इतिहासात कायम राहील. दिल्ली भेटीत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांचे विशेष अभिनंदन केले, तसेच तिन्ही सैन्य दलातील सैनिकांनी केलेल्या कामगिरीबद्दलही अभिनंदन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मये येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत रविवारी दुपारी दिल्ली येथील एनडीए बैठक आटोपून थेट मये महोत्सवासाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळेस स्थानिक पत्रकारांशी बोलताना दिल्ली भेट अत्यंत शुभदायी झाल्याचे सांगताना प्रत्येक मुख्यमंत्र्यांना सात मिनिटे बोलण्याचा अवधी मिळाला त्यावेळी आपण राज्याच्या योजना, तसेच नियोजित योजना व गोव्याला काय अपेक्षित आहे, यासंदर्भात मत मांडल्याचे सांगितले.
गोवा खाजन शेतीबाबत केंद्राचे सहकार्य, अपेक्षा असून, त्याबद्दलचा मुद्दाही आपण अधोरेखित केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, विकसित गोवा २०२७ नियोजन करण्याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केल्याचे सांगितले. जातीनिहाय जनगणनेला चालना दिल्याबद्दल गोमंतकीय जनतेच्या वतीने आपण पंतप्रधान मोदी यांचे विशेष अभिनंदन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्याला काय नवीन अपेक्षित आहे, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांत कोणत्या संधी घेणे शक्य आहे, अशा विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण निरीक्षणे करून काही मुद्दे मांडण्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.
डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती
बैठकीत वेगवेगळ्या नेत्यांचे मार्गदर्शनही लाभले. त्यातून नव्या योजनांना चालना मिळते, असे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान मोदी यांचे सतत मार्गदर्शन लाभल्याने जलदगतीने राज्याच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने आमचे सरकार डबल इंजिनच्या सहकार्याने अधिक गतिमानरीतीने विकासाला चालना देण्यास कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले. त्याबरोबरच राज्याचा विकास साधण्यासाठी आणखी काय करता येईल, याबाबतही चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.