पं. अजित कडकडे यांनी गोमंतकीयांची मान उंचावली: मुख्यमंत्री; दिमाखदार सोहळ्यात गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:26 IST2025-06-25T13:21:11+5:302025-06-25T13:26:31+5:30
कला व संस्कृती संचालनालयातर्फे कला अकादमीत आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शास्त्रीय आणि सुगम संगीताचे सुप्रसिद्ध गायक पं. अजित कडकडे यांना गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पं. अजित कडकडे यांनी गोमंतकीयांची मान उंचावली: मुख्यमंत्री; दिमाखदार सोहळ्यात गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंडित अजित कडकडे यांच्या रूपाने गोव्याला संगीत क्षेत्रातील हीरा सापडला आहे. त्यांच्या गायनाने केवळ मन तृप्त होत नाही तर आत्माही तृप्त होतो. कडकडे यांनी आपल्या शैलीदार गायनाने गोव्याची मान उंचावली. कष्ट, जिद्द व चिकाटीच्या बळावर ते आज यशाच्या शिखरावर पोहोचले असून प्रत्येक गोमंतकीयाला अभिमान वाटावा, असे त्यांचे योगदान आहे. युवकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन संगीत क्षेत्रात नाव कमवावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
कला व संस्कृती संचालनालयातर्फे मंगळवारी कला अकादमीत आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शास्त्रीय आणि सुगम संगीताचे सुप्रसिद्ध गायक पं. अजित कडकडे यांना गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंत्री सुभाष फळदेसाई, खासदार सदानंद शेट तानावडे, कला व संस्कृती खात्याचे माजी मंत्री तथा आमदार गोविंद गावडे, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार केदार नाईक, आमदार संकल्प आमोणकर, कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, सचिव सुनील अंचिपाका, पं. कडकडे यांच्या पत्नी छाया कडकडे उपस्थित होत्या.
यावेळी पं. अजित कडकडे यांच्या कारकिर्दीतील छायाचित्रांचे प्रदर्शन, त्यांच्या जीवनकार्यावरील माहितीपटाचे व माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले. यावेळी मानपत्र, स्मृतिचिन्ह प्रदान करून पं. कडकडे यांचा गौरव करण्यात आला.
वयाच्या अठराव्या वर्षी अजित कडकडे यांची संगीत क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली. कोंकणीबरोबरच मराठी, हिंदी, कन्नड या चारही भाषांमध्ये त्यांनी अजरामर गीते गायली आहेत. आज गोव्याच्या मातीतल्या माणसाचा गोमंत विभूषण पुरस्काराने गौरव करताना अभिमान वाटतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
माझा पुरस्कार गुरुंना समर्पित : पं. कडकडे
मला सुरुवातीपासून क्रिकेटचे वेड होते. त्या खेळाकडेच जास्त कल होता. मात्र, डिचोलीत पहिल्यांदा जेव्हा मी पं. जितेंद्र अभिषेकी यांचे गाणे ऐकले, तेव्हा मी ठरविले की आपणही गायक व्हायचे. गाणे शिकण्यासाठी मी जितेंद्र अभिषेकी बुवांकडे गेलो तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांना विचारले होते की, गाणे शिकल्यानंतर हा आपले पोट भरू शकेल का? त्यावर बुवा बाबांना म्हणाले की, लोकांना याचे गाणे आवडले तरच हा कमवू शकेल.
बुवांकडे दिग्गज कलाकार शिकायला यायचे. अनेकजण मला सांगायचे की जिकडे व्यवस्थित पैसे मिळतील तिकडे जा. हे ऐकून मी खिन्न व्हायचो; परंतु आतून आवाज यायचा की तू गायक होणार आणि याच बळावर मी बुवांकडे शिकलो. बुवांनी मला गाण्याव्यतिरिक्त पाच महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ज्यातून मी चांगला माणूस म्हणूनही घडत गेलो.
माझ्या या प्रवासात माझी पत्नी छाया हिचादेखील मोलाचा वाटा आहे. ज्यांच्यामुळे मी घडलो ते माझे गुरू जितेंद्र अभिषेकी आणि इतर गुरुंना माझा हा पुरस्कार मी समर्पित करतो, असे उद्गार पं. अजित कडकडे यांनी काढले.
पं. कडकडे हे गोव्याचे, पण महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी राहिली. असे असूनही ते गोव्याला विसरले नाहीत. त्यांचे 'देवाचिये द्वारी' हे गीत घराघरांत आजही ऐकले जाते. जगभर जिथे मराठी माणूस आहे तिथे पं. कडकडे यांची गीते आहेत. पीर्ण येथील आमच्या सप्तकावेळीदेखील त्यांचीच गाणी गायली जातात. - सदानंद शेट तानावडे, खासदार.
पं. कडकडे हे राज्याला मिळालेले भूषण आहेत. हा पुरस्कार केवळ पं. अजित कडकडे यांचा नसून संपूर्ण गोमंतकाचा हा सन्मान आहे. कडकडे यांनी आपल्या गायनाची जादू जगभर पोहोचवली आहे. - सुभाष फळदेसाई, समाज कल्याणमंत्री.