एसीबीकडून जि.प.तील गैरव्यवहाराची दखल
By Admin | Updated: October 11, 2015 02:38 IST2015-10-11T02:38:24+5:302015-10-11T02:38:24+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार राज्य शासनाकडे प्राप्त झाली.

एसीबीकडून जि.प.तील गैरव्यवहाराची दखल
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार राज्य शासनाकडे प्राप्त झाली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी याची दखल घेत गोपनीय चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती शुक्रवारी गडचिरोलीत आयोजित पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते मनोहर चलाख यांनी दिली.
या संदर्भात माहिती देताना चलाख म्हणाले, गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार झाला आहे. कोणतीही ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ही कंत्राटदार बनू शकत नाही. असे असताना देखील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ग्रामपंचायतींना कंत्राटदार बनवून १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर इमारत व रस्त्याचे कंत्राट दिले. याच पेपरवर करारनामेही करण्यात आले. जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यातील २८, धानोरा २४, आरमोरी १०, गडचिरोली ४१, चामोर्शी ३०, कुरखेडा २१, अहेरी २६, एटापल्ली १४, मुलचेरा १२, देसाईगंज १२, भामरागड ९ व कोरची १३ या संख्येनुसार ग्रामपंचायतींना काम देण्यात आले. यातून एकमेकांच्या संगणमताने कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार करण्यात आला. या प्रकरणाची लेखी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव, ग्राम विकास खाते व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती. त्यानुसार चौकशी सुरू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.