युवक काँग्रेस लोकप्रतिनिधींना जागविणार
By Admin | Updated: July 12, 2015 02:03 IST2015-07-12T02:03:45+5:302015-07-12T02:03:45+5:30
जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेला अनेक आश्वासने दिली होती.

युवक काँग्रेस लोकप्रतिनिधींना जागविणार
गडचिरोली : जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेला अनेक आश्वासने दिली होती. मात्र भाजपप्रणीत सरकारला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही अनेक महत्त्वाचे प्रश्न कायम आहे. या प्रश्नासंदर्भात आमदार व खासदारांनी आगामी पावसाळी अधिवेशनात आवाज उचलावा, याकरिता जिल्हा युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने रविवारी आमदार व खासदार यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, जिल्हा काँग्रेसचे महासचिव सतिश विधाते, महेंद्र बावनवाडे यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माहिती देताना पंकज गुड्डेवार व महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले, ९ जून २०१४ च्या राज्यपालांच्या पेसा कायद्यासंदर्भातील अधिसूचनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात गैरआदिवासी युवकांचे नोकरीचे दारे बंद झाली आहेत. जिल्हा निवड मंडळ स्थापन न झाल्यामुळे स्थानिक उमेदवारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे पेसा कायद्याच्या अधिसूचनेत सुधारणा करण्यात यावी, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, जातनिहाय जनगणना तत्काळ जाहीर करावी, शेतकऱ्याच्या धानाला प्रतीक्विंटल ३ हजार ५०० रूपये भाव देण्यात यावा, आदींसह विविध मागण्यांकरिता आमदार, खासदार यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्य व केंद्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यातील भाजपच्या आमदार, खासदारांनी जिल्ह्याच्या एकाही प्रश्नावर आवाज उठविला नाही. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात जिल्ह्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा होऊन सदर प्रश्न मार्गी लागावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी पत्रकार परिषदेला लता पेदापल्ली, अमोल भडांगे, अशोक चलाख, आकाश सादिलवार, गौरव अलाम, राहुल मुनघाटे, नितेश राठोड आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)