यंदा आम्ररसाची गोडी अविट राहणार!
By Admin | Updated: February 16, 2015 01:26 IST2015-02-16T01:26:33+5:302015-02-16T01:26:33+5:30
मागील अनेक वर्षांतील रेकॉर्ड मोडीत काढीत आंब्यांच्या झाडांना मोहोर आला आहे. आंब्याच्या झाडांची फांदी न् फांदी बहरली आहे.

यंदा आम्ररसाची गोडी अविट राहणार!
वैरागड : मागील अनेक वर्षांतील रेकॉर्ड मोडीत काढीत आंब्यांच्या झाडांना मोहोर आला आहे. आंब्याच्या झाडांची फांदी न् फांदी बहरली आहे. सध्या ज्या पध्दतीने आंब्याना मोहोर आला आहे. त्यातील एक पाव हिस्सा इतकाच बहर फळात रूपांतर होईपर्यंत कायम राहिल्यास व निसर्गाची अवकृपा न झाल्यास यावर्षात गावठी आंब्याच्या रसाची गोडी अविट राहणार आहे.
वैरागड परिसरात असलेल्या शेतशिवारातील तसेच आमराईतील आंब्याना बऱ्यापैकी मोहोर आलेला आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात निसर्गाने साथ दिल्यास साऱ्यानाच गावठी आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. मात्र अस्मानी संकट असले की आंबे असेच बहरून येतात, असे जुने जाणकार सांगतात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आमराया अस्तित्वात होत्या. गावात आमराई नाही, असा गाव शोधूनही सापडणार नाही. मात्र आता गावात आमराई सापडणार नाही.
पूर्वीच्या काळात गावागावांत गावठी आंब्याच्या मोठमोठ्या आमराया होत्या. बाहेर गावावरून मामाच्या गावाला जाणारे शाळकरी मुले या आमराईत जावून मनमुरादपणे खेळायचे बागळायचे तसेच दगडाने वार करून आंबे पाडायचे. परिश्रमाने आणलेल्या आंब्याची चवही त्या काळात अधिकच गोड होती. मात्र आता विकतच घ्यावे लागते.
काही गावातील पिढीजात आमराया काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी अल्प आर्थिक मोबदल्यासाठी स्व मालकीच्या जागेतील आंब्याची झाडे कंत्राटदारांना विकली तर काहींनी विटा भाजण्यासाठी आंब्याच्या झाडांच्या लाकडाचा उपयोग केला. त्यामुळे गाव खेड्यातील आमराया शेवटच्या घटका मोजत आहेत. गावातील आमरायाचा नष्ट झाल्या. त्यासोबतच आमरायातील पाखरांची चिवचिवाटही लोप पावत असल्याचे दिसून येते.