कामगार नोंदणी शिबिर एका दिवसात गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:03 IST2019-07-22T23:02:13+5:302019-07-22T23:03:40+5:30

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई व गडचिरोली येथील जिल्हा कामगार कार्यालयाच्या वतीने देसाईगंज येथील नगर परिषदेच्या सांस्कृतिक भवनात २१ ते २३ जुलैदरम्यान तीन दिवस कालावधीचे कामगार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र हे कॅम्प केवळ एका दिवसांत गुंडाळण्यात आले.

Workers' registration camp wrapped up in one day | कामगार नोंदणी शिबिर एका दिवसात गुंडाळले

कामगार नोंदणी शिबिर एका दिवसात गुंडाळले

ठळक मुद्देदेसाईगंजातील प्रकार : शेकडो कामगार नोंदणीविना घरी परतले

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई व गडचिरोली येथील जिल्हा कामगार कार्यालयाच्या वतीने देसाईगंज येथील नगर परिषदेच्या सांस्कृतिक भवनात २१ ते २३ जुलैदरम्यान तीन दिवस कालावधीचे कामगार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र हे कॅम्प केवळ एका दिवसांत गुंडाळण्यात आले. त्यामुळे २२ जुलै रोजी नोंदणीसाठी आलेल्या शेकडो कामगारांना आल्यापावली घरी परतावे लागले.
सर्व कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासनाच्या वतीने इमारत व इतर बांधकाम कामगारांची नोंदणी केली जात आहे. त्यादृष्टिकोनातून गडचिरोली, देसाईगंज आदीसह तालुकाठिकाणी शिबिर घेऊन कामगारांची नोंदणी केली जात आहे.
देसाईगंज येथे २१ ते २३ जुलैदरम्यान कामगार नोंदणी शिबिर असल्याबाबत प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर माहिती अनेकांकडून कामगारांपर्यंत पोहोचली. त्यामुळे देसाईगंज तालुक्यासह लगतच्या परिसरातील हजारो कामगार नोंदणी करण्यासाठी या शिबिरात आले. पहिल्या दिवशी कामगारांची नोंदणी करण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशी २२ जुलैला नोंदणी करून घेणारे कर्मचारीच गायब होते. परिणामी शेकडो कामगारांना स्वगावी परतावे लागले.
सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने नांगरणी, चिखलणी व शेतीची इतर कामे सुरू आहेत. त्यामुळे मजुरांची मागणी वाढली आहे. मात्र शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे लक्षात आल्यावर अनेक कामगारांनी मजुरी सोडून देसाईगंज शहर गाठले. मात्र दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी शिबिर गुंडाळण्यात आल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या कामगारांना स्वगावी परतावे लागले. शिबिराच्या ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आला नव्हता. सदर प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई करा
तीन दिवसांचे शिबिर एका दिवसात गुंडाळल्यामुळे कामगार नोंदणीपासून वंचित राहिले. कामगारांची फसवणूक झाली. या प्रकारामुळे जिल्हा कामगार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देसाईगंज शहर युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा प्रदेश सचिव शहजाद शेख, पिंकू बावणे यांनी दिला आहे.

Web Title: Workers' registration camp wrapped up in one day