१३० शेततळ्यांचा कार्यारंभ आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 00:35 IST2017-04-25T00:35:24+5:302017-04-25T00:35:24+5:30
जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ठरत आहे. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १३०० शेततळे बांधकामाचे उद्दिष्ट असताना...

१३० शेततळ्यांचा कार्यारंभ आदेश
४३ कामे पूर्ण : आरमोरी तालुक्याचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण होणार
वैरागड : जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ठरत आहे. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १३०० शेततळे बांधकामाचे उद्दिष्ट असताना एकट्या आरमोरी तालुक्यात आॅनलाईन प्रक्रियेतून शेततळ्याच्या कामासाठी २७६ अर्ज प्राप्त झाले. आरमोरी तालुक्याला १३० शेततळे कामाचे उद्दिष्ट असून सर्वच १३० शेततळ्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश तयार आहेत. यापैकी ४३ शेततळ्याचे काम पूर्ण झाले असून चार शेततळ्याचे काम सुरू आहे.
‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेच्या लाभासाठी २५ फेब्रुवारी २०१६ पासून आॅनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. संपूर्ण जिल्ह्याला १ हजार ३०० शेततळ्याचे उद्दिष्ट असून आरमोरी तालुक्याला १३० शेततळे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वच शेततळ्याचे कार्यारंभ आदेश तयार करण्यात आल्याने शेततळ्याच्या कामात आरमोरी तालुका १०० टक्के उद्दिष्ट गाठणार आहे. जलयुक्त शिवार अभियानच्या कामातही तालुक्यातील शेतकरी पुढाकार घेत असल्याने तालुक्यात कृषी क्रांती लवकरच होणार आहे. (वार्ताहर)
आरमोरी तालुक्यात आतापर्यंत ४३ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून चार शेततळ्याचे काम सुरू आहे. मे महिन्याच्या अखेर आरमोरी तालुक्याला मिळालेले शेततळ्याचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण होणार आहे. सदर अभियानामुळे सिंचन क्षेत्रात क्रांती होण्यास मदत होणार असून पाणी व चारा टंचाईवर आरमोरी तालुक्यातील शेतकरी मात करतील.
- एल. ए. कटरे, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी