१३ लाख दिवस केले काम
By Admin | Updated: December 18, 2014 22:55 IST2014-12-18T22:55:15+5:302014-12-18T22:55:15+5:30
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गडचिरोली या मागास जिल्ह्यात विशेषत: महिलांसाठी १३ लाख दिवसांचे रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. या रोजगाराच्या उपलब्धतेमुळे महिलांच्या हाती

१३ लाख दिवस केले काम
अच्छे दिन : रोजगार हमी योजनेतून महिलांनी दाखविली शक्ती
गडचिरोली : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गडचिरोली या मागास जिल्ह्यात विशेषत: महिलांसाठी १३ लाख दिवसांचे रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. या रोजगाराच्या उपलब्धतेमुळे महिलांच्या हाती मजूरीच्या रूपाने मोठी आर्थिक रक्कम आली. त्यामुळे सध्या महिलांसाठी अच्छे दिन ग्रामीण भागात आल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत विशेषत: शेतीशी संबंधित अकुशलक कामे केली जातात. गडचिरोली जिल्ह्यात उद्योग नसल्याने रोजगाराची वानवा आहे. त्यातही महिलांना रोजगार मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. धानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या चार महिन्यांच्या रोजगारावरच महिलांना अवलंबून राहावे राहते.
रोजगार हमी योजनेने मात्र महिलांना रोजगाराची चांगली संधी निर्माण झाली आहे. महिला व पुरूष यांच्या मजूरीत कोणतीही तफावत केली जात नसल्याने महिलावर्ग रोहयोचे काम करण्यास विशेष पसंती दर्शवित आहेत. चालू आर्थिक वर्षात सुमारे १३ लाख ३७ हजार ३६१ दिवस महिलांना रोजगार मिळाला आहे. पुरूषांना १६ लाख ५४ हजार ३६३ दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे.
रोहयोच्या कामावर मजुरीने काम करणाऱ्या महिलेला दिवसाचे किमान १६५ रूपये मजुरी दिली जाते. ग्रामीण भागात एवढी मजुरी मिळणे अशक्य आहे. दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी केवळ ८० ते १०० रूपये दिले जातात. त्यातही महिलेला दुपारच्या जेवनासाठी सुट्टी मिळेलच याची शास्वती राहत नाही.
रोजगाराअभावी जिल्ह्यातील महिलांना परावलंबी जीवन जगावे लागत होते. आज मात्र महिला रोहयोच्या माध्यमातून स्वत: कमाई करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावीत आहेत. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती पर्यायाने जीवनमान उंचावण्यात फार मोठी मदत झाली आहे. अपवाद वगळला तर रोहयोचे काम वर्षभर सुरू राहते. यामध्ये काही काम दिवसाच्या मजुरीप्रमाणे राहते. सदर काम करण्यास महिला अधिक रूची दाखवित असल्याचे दिसून येत आहे. रोहयोच्या माध्यमातून महिलांना वर्षभर रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)