वैरागडात महिलांची सुरू आहे पाण्यासाठी पायपीट
By Admin | Updated: May 6, 2015 01:38 IST2015-05-06T01:38:46+5:302015-05-06T01:38:46+5:30
गेल्या १०-१५ वर्षांपासून उन्हाळ्यात आरमोरी तालुक्यात वैरागड येथे पाणी टंचाईची भीषण समस्या ऐरणीवर येत आहे.

वैरागडात महिलांची सुरू आहे पाण्यासाठी पायपीट
वैरागड : गेल्या १०-१५ वर्षांपासून उन्हाळ्यात आरमोरी तालुक्यात वैरागड येथे पाणी टंचाईची भीषण समस्या ऐरणीवर येत आहे. गावातील २५ वर्षांपूर्वीची जुनी नळ पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली असून गावात पाण्याची असमान वितरण होत आहे. परिणामी गावातील बेघर वस्तीतील महिला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील हातपंपावरून पाणी आणत असल्याचे चित्र आहे.
वैरागड येथे २५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली जुनी नळ पाणी पुरवठा योजना वाढत्या लोकसंख्यमुळे अपुरी ठरत आहे. त्यामुळे सतत गेल्या १५ वर्षांपासून नागरिक व महिलांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात उन्हाळ्यात भासणारी पाणी टंचाईची भीषण समस्या तत्काळ मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी अनेकदा निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली.
मात्र नागरिकांच्या या निवेदनाची ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत भोयर यांच्या घराजवळ दीड लाख हजार लिटर क्षमतेची पाणी पुरवठ्याची नवीन टाकीचे बांधकाम करण्यात आले, मात्र वैरागडातील पाणी समस्या मार्गी लागली नाही.
अपुऱ्या नळ पाणी पुरवठ्यामुळे अनेक कुटुंबातील महिलांना हातपंप, विहिर आदी स्त्रोतांचा आधार घ्यावा लागत आहे. सदर स्त्रोतांचे अंतर दोन ते तीन किमी अंतरावर असल्याने महिलांची पाण्यासाठी सध्या पंचाईत होत आहे. (वार्ताहर)
२६ जानेवारी २०१३ रोजी वैरागड येथे झालेल्या ग्रामसभेत नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या ठरावाच्या प्रती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे २०१४ च्या डिसेंबर महिन्यात पाठविल्या. या ठरावात अनेक त्रुट्या आढळून आल्याने पाणी पुरवठा विभागाने नव्या नळ योजनेचा प्रस्ताव ग्रा.पं. प्रशासनाकडे परत पाठविला. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केला असून याला तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याचे माहिती आहे.