पाऊस नसल्याने रोवणी खोळंबली
By Admin | Updated: July 15, 2015 01:53 IST2015-07-15T01:53:16+5:302015-07-15T01:53:16+5:30
यंदा पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावली. पहिल्याच आगमनात पावसाच्या धारा संततधार राहिल्याने बळीराजाने पाऊस बंद झाल्यानंतर चिखलणी करून खरीप हंगामातील धानाची पेरणी केली.

पाऊस नसल्याने रोवणी खोळंबली
धान पऱ्हे करपण्याच्या मार्गावर : शेताच्या बांध्या अद्यापही कोरड्याच
देसाईगंज : यंदा पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावली. पहिल्याच आगमनात पावसाच्या धारा संततधार राहिल्याने बळीराजाने पाऊस बंद झाल्यानंतर चिखलणी करून खरीप हंगामातील धानाची पेरणी केली. पेरणी होताच पावसाने १० ते १५ दिवस दडी मारल्यामुळे धान पीक करपण्याच्या मार्गावर होते. परंतु दोन दिवसांपुर्वी पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला असला तरी विसोरा परिसरातील बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान पऱ्हे रोवणीलायक होऊनही शेतातील बांध्यांमध्ये पाणी न साचल्याने रोवणीचा कालावधी निघून जात आहे. परिणामी शेतकरी बांधवांमध्ये चिंता पसरली असून रोवणीची कामे खोळंबली आहे. येत्या आठवड्याभऱ्यात पावसाचे आगमन दमदार न झाल्यास शेतकरी बांधवांची अडचण आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. आकाशाकडे टक लावून शेतकरीबांधव मुसळधार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. देसाईगंज तालुक्यासह देसाईगंज उपविभागातील बहुतांश भागात अशीच परिस्थिती असून शेतकरी कमालीचा हवालदील झाला आहे. अनेक भागात वाढत्या उष्णतामानामुळे पऱ्हे करपू लागल्याने शेतकऱ्यांची चिंताा वाढली आहे . (वार्ताहर)
भामरागडातही १५ दिवसांपासून पाऊस गायब
जून महिन्याच्या १५ तारखेला भामरागडात पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दडी मारली असून शेतकरी हवालदील झाला आहे. अनेक ठिकाणी पऱ्हे सुकून गेले असून काहींनी दुसऱ्यांदा पऱ्हे टाकले. परंतु ते अद्यापही उगवलेले नाही. जून महिन्यात पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. तेंदूपत्ता हंगाम संपून शेतकरी शेती मशागतीच्या कामासाठी लागला आहे. परंतु पाउस नसल्याने शेतकऱ्याची चिंंता वाढली आहे. त्यामुळे पाऊस जर आला नाही तर भामरागड तालुक्यात अनेक शेत्या यंदा रिकाम्याच राहण्याची शक्यता आहे.