बिल भरूनही वीज पुरवठा खंडीतच
By Admin | Updated: June 8, 2015 02:10 IST2015-06-08T02:10:36+5:302015-06-08T02:10:36+5:30
येथील शेतकऱ्याने कृषीपंपाचे वीज बिल भरूनही खंडीत झालेला वीज पुरवठा सुरू करून देण्यास...

बिल भरूनही वीज पुरवठा खंडीतच
वैरागड : येथील शेतकऱ्याने कृषीपंपाचे वीज बिल भरूनही खंडीत झालेला वीज पुरवठा सुरू करून देण्यास वैरागड येथील वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांनी नकार दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सहा शेतकऱ्यांना एकाच रोहित्रावरून विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. यातील सहाही शेतकऱ्यांनी कृषीपंपाचे वीज बिल न भरल्याने त्यांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. खरीप हंगामाला सुरूवात झाल्याने पुढील अडचण टाळण्यासाठी सुधाकर लांजेवार यांनी वीज बिलाचा भरणा केला. वीज बिल भरल्यानंतर विद्युत पुरवठा सुरू करून देण्याची मागणी विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडे केली असता, त्यांनी इतर पाच शेतकरी जोपर्यंत वीज बिल भरत नाही. तोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करून देणार नाही, असा भूमिका घेतली आहे. कनिष्ठ अभियंत्याच्या या मनमानी कारभारामुळे खरीप हंगामाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एवढेच नाही तर सदर कनिष्ठ अभियंत्याने लांजेवारी यांनीच इतर शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची माहिती द्यावी, असे सांगितले. वास्तविक त्या शेतकऱ्यांकडून वीज बिलाची वसुली करणे ही वीज वितरण कंपनीची जबाबदारी आहे. मात्र वीज बिल वसुलीसाठी अशा पध्दतीने बिल भरणाऱ्या शेतकऱ्यालाच भरडले जात आहे. वीज बिल भरल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत होत नसेल तर वीज भरून उपयोग काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)