स्थानांतर रोखणार - लोकप्रतिनिधी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:53 IST2018-02-15T00:53:06+5:302018-02-15T00:53:59+5:30
तब्बल ५५ वर्षांपासून गडचिरोलीच्या वनवैभवात भर घालणाऱ्या कमलापूर येथील हत्तींचे पेंच व्याघ्र प्रकल्पात होणारे स्थानांतरण रोखण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे.

स्थानांतर रोखणार - लोकप्रतिनिधी सरसावले
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तब्बल ५५ वर्षांपासून गडचिरोलीच्या वनवैभवात भर घालणाऱ्या कमलापूर येथील हत्तींचे पेंच व्याघ्र प्रकल्पात होणारे स्थानांतरण रोखण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे.
सदर हत्तींचे १५ फेब्रुवारीपर्यंत स्थानांतरण करण्याचा आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी काढला होता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच कमलापूर परिसरासह जिल्हावासियांमध्ये तीव्र भावना उमटल्या. त्यामुळे पालकमंत्र्यांसह खासदारांनीही याला विरोध दर्शविल्याने हत्ती कॅम्पचे स्थानांतर रोखण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
१९६२ साली कमलापुरात केवळ एक हत्ती होता. काही वर्षानंतर आलापल्ली येथून दुसरा हत्ती आणण्यात आला. नंतर त्यांची पिलावळ झाली. आता तीन नर आणि चार मादी असे सात हत्ती येथे आहेत. वाघांचा माग घेण्याचे प्रशिक्षण या हत्तींना पेंच प्रकल्पात दिले जाणार असल्याचे निमित्त सांगण्यात आले आहे. मात्र कमलापुरातही हे हत्ती रिकामे नाहीत. जंगलातून मोठमोठी सागाची लाकडे वाहून नेण्यासाठी त्यांचा वापर कित्येक वर्षांपासून केला जातो. याशिवाय पर्यटकांच्या दृष्टीने हे हत्ती आकर्षणाचे केंद्र आहे.
एका ठिकाणी सात हत्ती पहायला मिळणे पर्यटकांसाठी दुर्मिळ असते. पण कमलापुरात ती सोय आहे. हे हत्ती येथून हलविल्यास गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या वनपर्यटकांचा हिरमोड झाल्याशिवाय राहणार नाही. औद्योगिक विकासाअभावी रोजगाराची दुसरी साधनं जिल्ह्यात नाहीत. किमान पर्यटकांचा ओढा वाढल्यास त्यातून काही प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. त्यामुळेच नागरिकांचाही हत्तींच्या स्थानांतरणास विरोध आहे. स्थानांतराबाबत वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय सुरू असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.
पालकमंत्री व खासदारांनी गांभीर्याने घेतला विषय
वनराज्यमंत्री असलेल्या पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी हत्तींच्या स्थानांतराचा हा विषय गांभिर्याने घेतला आहे. विशेष म्हणजे कमलापूर हे त्यांच्या गृहमतदार संघातील गाव आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने हा विषय निदर्शनास आणून दिल्यानंतर ना.आत्राम यांनी हत्ती कॅम्पचे स्थानांतर होऊ दिले जाणार नाही, असा निश्चिय लोकमतकडे व्यक्त केला.
जिल्ह्याचे खासदार अशोक नेते यांनीही यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. हत्ती कॅम्प हा गडचिरोली जिल्ह्याचे वैभव आहे. हे वैभव दुसरीकडे नेल्यास चुकीचा संदेश जाईल. पर्यटकांना या जिल्ह्याकडे आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा द्याव्यात अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे.