पऱ्हे करपण्याच्या मार्गावर

By Admin | Updated: July 8, 2015 01:55 IST2015-07-08T01:55:44+5:302015-07-08T01:55:44+5:30

मागील २० दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली असल्याने धान पिकाचे पऱ्हे तसेच सोयाबीन, तूर, कापूस आदी पिके करपायला लागली आहेत.

On the way to the path | पऱ्हे करपण्याच्या मार्गावर

पऱ्हे करपण्याच्या मार्गावर

पावसाची २० दिवसांपासून दडी : बळीराजा हवालदिल; दुबार पेरणीची येणार पाळी
गडचिरोली : मागील २० दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली असल्याने धान पिकाचे पऱ्हे तसेच सोयाबीन, तूर, कापूस आदी पिके करपायला लागली आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
पावसाळ्याला सुरूवात होताच चार दिवस पावसाने थैमान घातले होते. पाऊस निघून गेल्यानंतर पेरणीला जोर आला. १ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १० हजार हेक्टरवर पेरणी झाली असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र जवळपास पेरण्या आटोपल्या आहेत. ७ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ४४२.९१ एवढा पाऊस पडला आहे.
मागील २० दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली आहे. दिवसभर कडाक्याची ऊन पडत असल्याने जमिनीतील ओलावा नष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. परिणामी जमीन कडक होऊन धानाचे पऱ्हे करपायला सुरूवात झाली आहे. दुरून पऱ्हे हिरवेगार दिसत असले तरी कडक उन्हामुळे पाने गुंडाळण्यास सुरूवात झाली आहे. पुन्हा पाच ते सहा दिवस पाऊस न पडल्यास संपूर्ण पऱ्हे नष्ट होण्यास धोका निर्माण झाला आहे. हजारो रूपये किमतीचे बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. मात्र पावसाअभावी सदर पऱ्हे करपण्याचा धोका निर्माण झाला असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. (नगर प्रतिनिधी)
अनुदानावर बियाणे उपलब्ध करा
दुबार पेरणीचे संकट कोसळल्यास शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. बँकांकडून कर्ज काढून बियाणे खरेदी केले आहे व शेतीची मशागतही केली आहे. जवळचे पैसे आता खर्च झाले आहेत. त्यामुळे पुन्हा बियाणे खरेदी करण्यासाठी कुठून पैसे आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाने दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
रोवणी लांबणीवर जाणार
सध्या टाकलेले पऱ्हे करपल्यास शेतकऱ्यांना दुबार पऱ्हे टाकावे लागणार आहेत. सदर नवीन पऱ्हे तयार होण्यासाठी आणखी २० ते २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. परिणामी धानाची रोवणी लांबून धानाच्या उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सिरोंचा तालुक्यात कापसाचे तर चामोर्शी तालुक्यात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणी करतानाच रासायनिक खत टाकले जात असल्याने या दोन पिकाला पावसाची नितांत गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी पाणी देत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांसमोर पीक करपताना बघितल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नाही.
विसापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर डोमाजी देशमुख यांनी नागपूर येथील एका खासगी कंपनीच्या धान वाणाच्या तीन बॅगची खरेदी गडचिरोली शहरातील एका कृषी केंद्रातून केली. परंतु खरेदी केलेल्या धानाच्या बिजाईमध्ये २५ ते ३० टक्के लांबोर व खडधान असल्याचे आढळून आलले आहे. यावरून कृषी केंद्रातून धानाच्या बिजाई बॅगमध्ये सर्रास भेसळ करून विक्री होत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर भेसळयुक्त बियाणे निघाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. कंपनीने या संदर्भात चौकशी करावी, अशी मागणी ज्ञानेश्वर देशमुख या शेतकऱ्याने केली आहे.

Web Title: On the way to the path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.