पाणी पुरवठा विभागाची वाहने भंगारात
By Admin | Updated: July 22, 2015 02:20 IST2015-07-22T02:20:38+5:302015-07-22T02:20:38+5:30
येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची दोन्ही वाहने नादुरूस्त असून ती भंगार अवस्थेत पडून आहेत.

पाणी पुरवठा विभागाची वाहने भंगारात
दुरूस्तीला निधीच नाही : प्रभारी अधिकाऱ्यावरच कार्यालयाचा डोलारा
विवेक बेझलवार अहेरी
येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची दोन्ही वाहने नादुरूस्त असून ती भंगार अवस्थेत पडून आहेत. परिणामी ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरूस्ती करण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे.
अहेरी ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाच्या हद्दीत आलापल्ली, नागेपल्ली, भूजंगरावपेठा, वांगेपल्ली, चिंचगुडी, किष्टापूर, गडअहेरी आदी पाणी पुरवठा योजना येतात. या योजनांची देखभाल करण्यासाठी अहेरी येथे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या विभागाला शासनाकडून दोन वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती. ही वाहने काही काळ व्यवस्थित सुरू होती. मात्र मागील दोन ते तीन वर्षांपासून ही दोन्ही वाहने बंद पडली असून ती भंगार अवस्थेत कार्यालयाच्या आवारात पडून आहेत. वाहनचालकाचे पद रिक्त असल्याने या वाहनांकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. एखाद्या वेळेस दौरा करण्याची पाळी आल्यास किरायाणे वाहन घ्यावे लागते. वाहनांमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या कार्यालयाला वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
या कार्यालयात उपविभागीय अभियंत्याचे एक पद रिक्त आहे. वरिष्ठ सहायकाचेही पद मंजूर असून ते सुध्दा रिक्त आहे. कनिष्ठ सहायक, वाहनचालक, परिचर यांचेसुध्दा प्रत्येकी एक पद रिक्त आहे. एकूण १४ पदांपैकी केवळ सात पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित सात पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत असलेले बारापात्रे यांच्याकडे सुध्दा अतिरिक्त प्रभार देण्यात आला असल्याने ते सुध्दा कार्यालयाला जास्त वेळ देऊ शकत नाही. अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांची कामे वेळेवर होण्यास अडचण निर्माण होत आहे. या कार्यालयांमध्ये वॉल्वमन म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचे एप्रिलपासून वेतन झाले नाही. याबाबत अधिकची माहिती जाणून घेतली असता, संबंधित हेडवर निधीच उपलब्ध नसल्याने वेतन झाले नसल्याची माहिती दिली.
अधिकारी बदलले, फलकात जुन्यांचा नामोल्लेख कायम
या कार्यालयात केंद्रीय माहिती अधिकारचे फलक लावण्यात आले आहे. त्यावर सहायक माहिती अधिकारी म्हणून एच. एस. मानके तर माहिती अधिकारी म्हणून टी. आर. मडावी यांचे नाव नमूद करण्यात आले आहे. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांची कार्यालयातून दोन वर्षांपूर्वी बदली झाली आहे. दोन वर्ष उलटूनही बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे बदलविण्यात आले नाही. यावरून या कार्यालयातील दस्तावेज किती अपडेट ठेवली जातात, हे दिसून येते.